
तलाव पाळी येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : १४ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो; परंतु तीन वर्षांपासून हा दिवस देशासाठी काळा दिवस ठरला आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवान हुतात्मा झाले. त्यामुळे या दिवशी अनेक ठिकाणी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. यानिमित्त समता विचार प्रसारक संस्था ठाणेतर्फे माझा देश माझा व्हॅलेंटाईन या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तलावपाळी येथे पार पडला. या वेळी संस्थेतर्फे देशभक्तिपर संगीतमय कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे संस्थापक विश्वस्थ लतिका सु. मो. व संजय गोपाळ यांनी तलाव पाली येथे उपस्थित नागरिकांना पुलवामा हल्ल्याबद्दल माहिती दिली. या वेळी अजय जाधव, मीनल उत्तुरकर, अनुजा लोहार, सुशांत जगताप व इतर सदस्य उपस्थित होते.