
उल्हासनगरात महाशिवरात्रीनंतर श्रमदान स्वच्छता अभियान
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : महाशिवरात्रीनंतर पालिका आयुक्त अजीज शेख आणि अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या श्रमदान स्वच्छता अभियानात तब्बल दहा टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी दिली. उल्हासनगरच्या हिराघाट ते पवई चौक परिसरात महाशिवरात्रीची जत्रा भरते. जत्रेत मोठ्या प्रमाणात अन्नदान, प्रसाद, सरबतचे वाटप करण्यात आल्यावर पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास, कप आदी स्वरूपाचा कचरा रस्त्यावर पडलेला असतो. त्याअनुषंगाने आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या श्रमदान स्वच्छता अभियानात उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, आर. के. तलरेजा महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता मेनन, माजी नगरसेविका राजश्री चौधरी, शुभांगी बेहनवाल, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती तायडे, सतीश मराठे, राजेंद्र देठे, नारायण वाघ, मीरा सपकाळे, जयशील रणवीर, रवि गवई, राजेश जाधव, मनोहर (पप्पू) बेहनवाल आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छतेची शपथ घेऊन दहा टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.