
एनएमएमटीचे थांबे बेघरांचे आश्रयस्थान
जुईनगर, ता.२०(बातमीदार)ः नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून विविध ठिकाणी बस थांबे बांधण्यात आले आहेत. मात्र सानपाडा विभागातील हे थांबे भिकारी, बेघरांसाठी आश्रयस्थान बनले असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
नवी मुंबईतील प्रवाशांना एनएमएमटी आणि बेस्ट बसेसची विविध बस थांब्यावर तासंनतास वाट पहावी लागते. त्यामुळे परिवहन विभागाच्या वतीने बस शेल्टरची निर्मिती करण्यात आली. परंतु,काही बस शेल्टरमध्ये प्रवाशी बसलेले दिसत नाही. सानपाडा विभागामध्ये अनेक ठिकाणी बस थांबे आहेत, मात्र या बस थांब्यामध्ये असलेल्या आसन व्यवस्थेचा उपयोग चक्क भिकारी, बेघर नागरिक, नशापान करणाऱ्या व्यक्ती घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत वेगवेगळ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा इथे गर्दुल्ले, भिकारी विश्रांती घेत असतात. त्यामुळे उन्हामध्ये उभे राहावे लागत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
------------------------------
बस शेल्टरवर अनेकवेळा गर्दुल्ले, भिकारी विश्रांती घेतात. त्यामुळे बसण्याला जागा मिळत नाही. बस वेळेत येत नाही, त्यामुळे तासंनतास उन्हात उभे राहावे लागते. अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक उन्हामध्ये रस्त्यावरच बसतात. त्यामुळे परिवहन विभागाने कारवाई करावी.
-तृप्ती देसाई, प्रवासी