
हंडामुक्त पालघरसाठी प्रयत्न करा
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) : जिल्हा परिषद उटावली गटातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नऊ योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत साखरे व नऊ गावे या प्रादेशिक योजनांचा आढावा बांधकाम व आरोग्य समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी ढोणे यांनी हंडामुक्त पालघर हे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन अधिकाऱ्यांना योजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
उटावली मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत प्रलंबित असलेली कामे, सुरू न झालेली कामे, जागेबाबत अडचण असलेल्या योजना, ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे रखडलेली कामे, वन विभागाकडील समस्या, पाण्याच्या स्त्रोतांबाबतच्या समस्या याबाबत स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांच्याशी चर्चा करून सदर समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच समस्यांवर योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना सभापतींमार्फत देण्यात आल्या. या वेळी कार्यकारी अभियंता गंगाधर निवडुंगे, उपअभियंता पवार, संबंधित अभियंते, ग्रामसेवक, सरपंच व ठेकेदार उपस्थित होते.
----------------------
समस्या मिटवण्यासाठी ‘जलजीवन’ संधी
वर्षानुवर्षे पालघर जिल्ह्याला भेडसावत असणाऱ्या पाणी समस्या दूर होऊन कायमस्वरूपी तोडगा निघण्याची संधी जलजीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत होणाऱ्या सर्व योजनांच्या माध्यमातून आली आहे. तरी आपापल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, स्थानिक सरपंच, सर्व लोकप्रतिनिधी यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी समनव्य साधून योग्य रीतीने राबवून घ्याव्यात. तसेच राजशिष्टाचाराप्रमाणे सर्व पदाधिकारी यांना निमंत्रित करून उद्घाटन करावे, असे आवाहन या वेळी सभापती संदेश ढोणे यांनी उपस्थितांना केले.