
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!
मुंबादेवी, ता. २८ (बातमीदार) ः बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आझाद मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली; परंतु सीमावर्ती भागातील अनेक गावे मागील ६६ वर्षांपासून कर्नाटकच्या जोखडात बंदिस्त आहे. कर्नाटक सरकारच्या जुलमी अत्याचाराविरोधात मराठी भाषिक नागरिक अनेक वर्षांपासून लढत आहे. महाराष्ट्र सरकारने सीमावर्ती भागातील लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत; मात्र हा भाग महाराष्ट्रात विलीन होत नाही, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सीमा प्रश्न सुटवा आणि सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यावेळी केली. या धरणे आंदोलनाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, रोहित पवार, अतुल बेनके, बालाजी किणीकर, भरत गोगावले, माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
---
सीमावर्ती भागातील मराठी भाषिक अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत. या लढ्याची आम्हाला जाणीव असून हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
- शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री