
दिघामधील पाणपोई बंद
वाशी, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरांमध्ये सुशोभीकरण करण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये तर वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची दिघा विभागातील चौकामध्ये पालिकेकडून पाणपोई उभारण्यात आली आहे. ही पाणपोई बंद असून ती सुरू करण्यात यावी, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
सद्यस्थितीत कडक उन्हाळा सुरू असून अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे तहान जास्त प्रमाणात लागत आहे. डॉक्टरांकडूनही जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पालिकेने दिघा येथील चौकात पाणपोई बसवलेली आहे; मात्र ती बंद अवस्थेत आहे. नागरिकांची गरज लक्षात घेतात ही पाणपोई सुरू करण्यात यावी, अशी मागणी गवते यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाटसरूंसाठी दिघामध्ये पाणपोई उभारण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने पाणपोई उभारली आहे; पण प्रत्यक्षात ही पोणपोई सुरू झाली नाही. यंदा उन्हाच्या प्रचंड झळा लागत आहेत. त्यामुळे पालिकेने ही पाणपोई सुरू करावी.
- नवीन गवते, माजी स्थायी समिती सभापती, नवी मुंबई पालिका