मुंबईतील नालेसफाईच्या कामांना मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील नालेसफाईच्या कामांना मुहूर्त
मुंबईतील नालेसफाईच्या कामांना मुहूर्त

मुंबईतील नालेसफाईच्या कामांना मुहूर्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : मुंबईसह उपनगरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात झाली आहे. नालेसफाईच्या २७ कामांसाठी नुकतेच कार्यादेश देण्यात आले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांनी यंत्रसामुग्रीची पूर्वतयारी सुरू केली असून, यंदा साडेदहा लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गाळ काढण्याच्या कामावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारली जाणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले व नदीतील गाळ काढला जातो. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ हा पावसाळ्याआधी काढला जातो; तर १५ टक्के पावसाळ्यादरम्यान, १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जातो. नालेसफाईची कामे दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरू होतात. गेल्या वर्षी पालिकेची मुदत मार्चमध्ये संपली होती. त्यामुळे नालेसफाईचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूरच होऊ न शकल्याने हे प्रस्ताव प्रशासकीय राजवटीत मंजूर होण्यास वेळ लागला. त्यामुळे मागील वर्षी अर्धा एप्रिल महिना संपला तरी नालेसफाईला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे पालिकेला युद्धपातळीवर नालेसफाईची कामे हाती घेऊन ती पूर्ण करावी लागली होती. निवडणूक लांबल्याने पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासकीय राजवटीत नालेसफाईच्या कामांच्या निविदा मागवल्यानंतर रखडलेली प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.

३१ कामांसाठी यंदा निविदा
यंदाच्या पावसाळ्यात पालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामांसाठी २२६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. छोटे नाले, मोठे नाले, रस्त्याच्या कडेची पावसाळी गटारे व मिठी नदी आदींमधील गाळ काढण्याच्या एकूण ३१ कामांसाठी यंदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २७ कामे लवकरच सुरू होणार आहेत. मोठ्या नाल्यांसाठी ९० कोटी, छोट्या नाल्यांसाठी ९० कोटी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

३१ मेपर्यंत गाळ काढणार
मोठ्या नाल्यांतून जवळपास ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन, तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन गाळ काढला जातो. एकूणच जवळपास साडेदहा लाख मेट्रिक टन गाळ काढून मुंबईबाहेरील क्षेपणभूमीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी साडेसात लाख मेट्रिक टन गाळ पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत काढण्यात येणार आहे.