
एसटीतील महिलांच्या ५० टक्के सवलतीबाबत संभ्रम
मुंबई, ता. १५ ः अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के प्रवास भाड्यात सवलत देण्याच्या योजनेची घोषणा केली. त्यामुळे एसटीच्या महिला प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र घोषणा करताच त्याची अंमलबजावणी झाल्याचा गैरसमज एसटीच्या प्रवाशांमध्ये पसरल्याने प्रवासादरम्यान महिला प्रवासी आणि वाहकांमध्ये खटके उडत आहेत. काही ठिकाणी महिला प्रवासी आणि एसटीच्या वाहकांमध्ये ५० टक्के सवलत देण्यावरून वाद झाल्याच्या घटना समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत; मात्र महिला प्रवाशांना प्रवासात सवलत मिळवण्यासाठी आणखी किमान एक महिना वाट बघावी लागणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर त्यासंबंधित शासन आदेश काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय बाबी पूर्ण करून एसटी महामंडळाला अंमलबजावणीचे आदेश दिले जाणार आहेत. त्यानंतर राज्यभरात महिलांना ५० टक्के प्रवास सवलत लागू केली जाणार आहे. त्यामुळे साधारण एक महिना या प्रक्रियेसाठी जाणार असून एसटीच्या प्रवाशांनी कोणताही संभ्रम करून घेऊ नयेत, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.