
अवकाळी पावसाने लोकल वाहतुकीला फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईसह उपनगरात गुरुवारी (ता. १६) झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीला बसला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते भायखळा, सीएसएमटी ते कुर्ला मार्गावर जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना हाल झाले.
पावसामुळे ओव्हर हेड वायर आणि लोकलच्या पेंटोग्राफमधील वीजप्रवाह कमी-जास्त होत होता. यामुळे भांडुप, भायखळा, दिवा, डोंबिवली आणि वडाळा स्थानकात काही ठिकाणी रेल्वेगाड्या खोळंबून होत्या. भांडुप आणि भायखळा स्थानकात लोकल खोळंबल्याने कल्याण, कसारा आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक विलंबाने धावत होती. याचा फटका रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. पावसाचा जोर कमी झाल्यावर या गाड्या रवाना करण्यात आल्या, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हार्बर लोकल २० मि. विलंबाने
गुरुवारी सायंकाळी गर्दीच्या वेळेत लोकलचा खोळंबा झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अन्य स्थानकातील इंडिकेटरवरून लोकलच्या वेळा देखील गायब झाल्या होत्या. या गोंधळामुळे हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावत होत्या.