
आरटीई प्रवेशास मुदतवाढ
जव्हार, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील नागरिकांना प्रगती करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे, त्याच दृष्टीने राज्य शासनाच्या आरटीईअंतर्गत दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत १७ मार्च होती. मात्र, आता शासनाने ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविली आहे. आरटीईनुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी एकूण पटसंख्येच्या २५ टक्के जागा राखून ठेवल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतात. यंदाच्या वर्षासाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी १ ते १७ मार्चपर्यंत देण्यात आला होता. परंतु पालकांच्या मागणीनुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. २५ मार्चनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.