
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे परिवहनला ग्रहण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणेकरांना सुरक्षित व सुखदायक प्रवास देण्यासाठी ठाणे परिवहनने कंबर कसली आहे. त्यात परिवहनच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने नव्याने दाखल होणाऱ्या प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक व सीएनजी बस उपलब्ध होणार आहेत. दुसरीकडे परिवहन सेवेतून वर्षभरात परिवहनमधून १४५ कर्मचारी सेवा निवृत्त झाले असून, आणखी ७५ हून अधिक कर्मचारी सेवेतून निवृत्त होणार आहे. त्यामुळे परिवहन सेवेला चांगले दिवस येत असताना, आता सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे. ठाणे परिवहनचा २०२३-३४ चा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यावेळी सभापती विलास जोशी यांनी ही खंत व्यक्त केली.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात ११ बस सेवेत दाखल झाल्या आहेत. जून अखेरपर्यंत सर्व १६५ इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल होणार आहेत. या बसचे तिकीट कमी असल्याने प्रवाशांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. परिवहनचा यापूर्वी खर्च हा वार्षिक ४१० कोटींच्या आसपास होता. सातवा वेतन आयोग, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पद्दोन्नती, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, कर्मचाऱ्यांची थकबाकी व इतर परिवहनसाठी लागणाऱ्या साहित्यामुळे परिवहनचा खर्च हा आजच्या घडीला ५६८ कोटींच्या घरात गेला आहे. त्यामुळे परिवहनला आजही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एवढे असूनही परिवहनला सोमवारी २७ लाख ९८ हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यात आता सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे.
तोडगा कसा काढायचा?
परिवहनच्या ताफ्यातील १४५ कर्मचारी हे मागील वर्षभरात सेवानिवृत्त झाले आहेत. तर आता आणखी ७५ च्या आसपास कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यात सरकारकडून नवीन पदे भरण्यास ग्रीन सिग्नल नसल्याने यावर तोडगा कसा काढायचा असा पेच परिवहनला पडला आहे.
---------------------------------
ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण सुरू असून, स्वच्छतेकडेही लक्ष दिले जात आहे. या अर्थसंकल्पातही यासाठी मोठी तरतूद दिसत आहे. शहर स्वच्छ व सुंदर होत असून मुख्य म्हणजे त्याचा कररुपी बोजा ठाणेकरांवर नाही, याचे समाधान वाटते.
- प्रशांत पार्टे, वृंदावन सोसायटी
शौचालयाचा विषय अर्थसंकल्पात हाताळण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात चांगले, स्वच्छ शौचालय मिळतील आणि महिलांची होणारी कुचंबना टळेल अशी अपेक्षा आहे.
-प्रिती भिडे, कळवा
अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीच दिसले नाही. शहरातील काही उद्यानांची अवस्था खराब आहे. नाना-नानी पार्क असो वा विश्रांती कट्टा, ज्येष्ठ नागरिक कट्टा याकडेही पालिकेने लक्ष देणे अपेक्षित आहे.
वसंत जोशी, नौपाडा
केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्ती दारिद्र्य निर्मूलन योजनेतंर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, पालिकेच्या या अर्थसंकल्पात या निधीची घोषणा झालेली नाही.
-मोहम्मद खान, दिव्यांग सेना