
उल्हासनगरात करवाढ टळली !
उल्हासनगर, ता. २३ (वार्ताहर) : कोणत्याही प्रकारची करवाढ नसणारा ४६ लाख २ हजार रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प गुरुवारी पालिका आयुक्त अजीज शेख यांनी सादर केला आहे.
उत्पन्न ८४३ कोटी ७२ लाख आणि खर्च ८४३ कोटी २६ लाख असा वास्तववादी व काटकसरीचा अर्थसंकल्प बनविण्याचा प्रशासनाचा हेतू असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली.
विशेष म्हणजे गेल्या नऊ वर्षांपासून बंद असलेली परिवहन सेवा सुरू करण्यासाठी १९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेवा सुरू झाल्यावर त्यात महिला, दिव्यांग आणि विद्यार्थी यांना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. तसेच, सरकारकडून ३० कोटी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
----------------------------------
खातेनिहाय तरतूद
शिक्षण विभागासाठी ७४ कोटी १५ लाख
आरोग्य विभागासाठी १६ कोटी ९२ लाख
घनकचरा व्यवस्थापन करिता ७५ कोटी ९४ लाख
सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १३४ कोटी
पर्यावरणाकरिता ६ कोटी
मल व जल वाहिन्यांसाठी ३७ कोटी ७२ लाख
महिला व बालकल्याण विभागाकरिता ९ कोटी ४२ लाख
दिव्यांग विभागासाठी ९ कोटी ४२ लाख
विद्युत विभाग १६ कोटी ६८ लाख
एमआयडीसीच्या पाण्याच्या देयकांसाठी ५४ कोटी
वेतन, निवृत्ती वेतन आदी प्रशासकीय बाबींसाठी २६० कोटी
उद्यान विभाग ६ कोटी ८५ लाख
अग्निशमन दल ३ कोटी ४० लाख
-----------------------------
कोट
पाण्याच्या बिलाची वसुली, मालमत्ता कर, मालमत्ता विभाग, नगररचना विभागाकडून देण्यात येणारे बांधकाम परवाने, सरकारकडून मिळणारे अनुदान हे उत्पन्नाचे स्रोत आहेत.
शहरातील जनतेच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबीत व्हाव्यात, शहरातील सर्वस्तरीय, दुर्बल, दिव्यांग, महिला, दलित, अल्पसंख्याक या सर्व घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न आहे.
- अजीज शेख, आयुक्त