आपदा मित्र ठरतात देवदूत

आपदा मित्र ठरतात देवदूत

प्रमोद जाधव, अलिबाग
डोंगर माथ्यावर पर्यावरणाचा ऱ्हास, जमिनीची धूप, नदीपात्रातील भराव आदी कारणांमुळे रायगड जिल्ह्यात दरडीसह पुराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय यंत्रणेच्या साहायाने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला असताना, आपत्ती निवारणासाठी गावांतील १८ ते ४० वयोगटातील तरुणांचा समावेश आपदा मित्र म्हणून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३०० जणांची आपदा मित्र म्हणून त्यांची निवड केली असून हे आपदा मित्र आपत्कालीन परिस्थितीत आपदग्रस्तांसाठी वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यात वाढते औद्योगिकरण, व नागरिकरणामुळे गावे, शहरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. नदी, खाड्यांमध्ये भराव करून त्या ठिकाणी बांधकाम करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याचा परिणाम नदी, खाड्यांमधील पाण्याचे पात्र बदलत आहे. त्यामुळे अनेक गावांसह शहरी भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीवर अधिक भर दिला जात असला, वणव्याच्या माध्यमातून झाडे नष्ट होण्याचे प्रकार वाढत आहे. डोंगर-माथ्यावरील झाडांच्या संख्येतही घट होत आहे. जमिनीची धूप होत असल्याने दरड कोसळण्याचे संकट जिल्ह्यावर कायमच राहिली आहे.
दरवर्षी पावसात दरड कोसळण्याबरोबरच पुरामध्ये वाहून जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आपत्कालीन परिस्थिती आटोक्यात आणताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु आपत्ती निवारणासाठी आता गावातील मंडळींचीच आपदा मित्र म्हणून मदत घेण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील माजी सैनिक, एनसीसी कॅडेट, एनएसएसचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक युवती, होमगार्ड, पोलिस मित्र, जीवरक्षक, सागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवक, नागरीक संरक्षण दलाचे स्वंयसेवक व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. आपत्तीबाबत पूर्व सूचना देणे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे अशी कामे त्‍यांच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
नैसर्गिक आपत्तीची माहिती देण्यासाठी आणि सामना करण्यासाठी आपदा मित्र उपक्रम राबवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये २० मार्च रोजी क्रांती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तसेच महाड येथील चवदार तळ्याला भेट देण्यासाठी राज्यभरातून हजारो अनुयायी दाखल झाले होते. चवदार तळे पाण्याने भरलेल्या असल्याने या तलावात पाण्याचा स्पर्श करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनानामार्फत आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आली होती. गर्दीमध्ये तळ्यात पडून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या बोटीत चार आपदा मित्र कार्यरत होते. चवदार तळ्याच्या पायऱ्यांवरून ये - जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपदा मित्र मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच वारंवार पूर्वसूचना देत होते.

गाव पातळीवर आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राहावा यासाठी आपदा मित्रांची मदत घेण्यात येत आहे. पूर्वसूचना देण्याबरोबरच आपत्ती निवारणासाठी आपदा मित्रांचे सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यात ३०० आपदा मित्र तयार केले असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत आपदा मित्रांचाही मोलाचा सहभाग असेल.
- सागर पाठक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com