मार्च अखेर वसुलीचा शेतकऱ्याला धसका

मार्च अखेर वसुलीचा शेतकऱ्याला धसका

वाडा, ता. २८ (प्रतिनिधी) : शेतकऱ्याने सेवा सहकारी सोसायट्यांकडून बिनव्याजी घेतलेले पीककर्ज मार्चअखेरपर्यंत भरणे गरजेचे असल्याने मार्च महिन्याचा आठवड्यात सोसायट्यांकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. याचा धसका शेतकरी घेताना दिसून येत आहे. शेतकरी बॅंकेत आपले सोने ठेवून हे पीककर्ज फेडताना दिसून येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह सहकारी सोसायट्या मे-जून महिन्यात शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज योजना दरवर्षी राबवतात. पावसाळ्यात भातशेतीची लागवड करण्यासाठी हजारो शेतकरी हे पीककर्ज घेतात. त्यानंतर मार्चअखेरपर्यंत हे कर्ज भरावे लागते. कर्ज न भरल्यास त्यावर व्याज लावले जाते. त्यामुळे मार्चअखेर आली असून शेतकरी पीककर्ज सोसायट्यांत भरताना दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, असे शेतकरी घरातील सोन्याचे दागिने बॅंकांत ठेवून कर्जाची परतफेड करताना दिसून येत आहेत.
भात शेतीही सध्या निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असून कधी ओला दुष्काळ; तर कधी कोरडा दुष्काळ, असे अनेक वर्षांपासून सुरू असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. भाताला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येत आहे. त्यामुळे हे कर्ज भरायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे भाताला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी घोणसई येथील शेतकरी नितीन चौधरी यांनी केली आहे.
शेतकऱ्याची शेती सतत तोट्यात जात असल्याने मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य, मुलांचे लग्न यासाठी खर्च करण्यासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागत आहे. अशाच गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या भाजीपाला, वीटभट्टी, कडधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आणखीन बेजार झाला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com