चाकरमानी अडकले कोंडीत

चाकरमानी अडकले कोंडीत

वसई, ता. १० (बातमीदार) : वाहतूक कोंडीने वसईकरांसह येथे कामानिमित्त येणारे चाकरमानी प्रचंड बेजार झाले आहेत. अशात सोमवारी मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते, तर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसही या कोंडीत अडकल्याने बस थांब्यावर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या असल्याचे चित्र होते. सुमारे दोन ते चार किमीचे अंतर पार करण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागत होता. यामुळे या कोंडीतून मुक्तता कधी मिळणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
वसईत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून छोट्या-मोठ्या कारखान्यांत मुंबई, ठाणे, पनवेल, पालघरमधील नागरिक कामानिमित्त ये-जा करत असतात. वसई पूर्वेला स्टेशन परिसरात आल्यानंतर परिवहन सेवेच्या बस, खासगी किंवा कंपनीच्या वाहनांचा आधार घेत कामगार पुढचा प्रवास करतात. मात्र सोमवारी सकाळपासून वसई पूर्वेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वसई पूर्वेला रेंज ऑफिस, वसंतनगरी या ठिकाणी सिग्नल व्यवस्था आहे, परंतु कोंडीची रांग सातिवलीपर्यंत पोहचली होती. सकाळी आठ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वसई पूर्वेला नवघर परिसरातही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली.
वसईत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे, पण एकीकडे रस्ते रुंद करण्यात आले असले तरी पर्यायी व्यवस्थेचा अभाव, अपुऱ्या उपाययोजना यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. परिणामी चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना मात्र स्टेशन परिसरात ये-जा करण्यासाठी कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
------------
बससाठी रांगा
कामावर जाण्यासाठी वसई पूर्वेला बस पकडण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र कोंडी असल्याने वाहनेदेखील उभी होती. त्यामुळे कामावर जाण्यास उशीर होत असल्याचे चाकरमान्यांचे म्हणणे आहे.
------------
अर्ध्यातून पायी स्थानकाकडे प्रस्थान
वसई पूर्वेकडील राहणारे नागरिक नोकरी किंवा कामानिमित्त मुंबई, मिरा-भाईंदरकडे प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकात येऊन लोकल पकडतात; परंतु कोंडीमुळे या नागरिकांना अर्धाच प्रवास वाहनांतून करावा लागतो. जेथून वाहतूक कोंडी सुरू होते, तिथून पुढे पायी रेल्वेस्थानक गाठत आहेत.
------------
वसई पूर्वेला नेहमीच कोंडी होत असते. त्यामुळे कामावर जाण्यासाठी लवकर आलो तरीही उशीर होतो. घरी जाताना देखील हीच परिस्थिती अनुभवयास मिळत असते. यातून प्रशासनाने मार्ग काढावा.
- रवी पाटील, प्रवासी
-----------
वाहतूक कोंडी जास्त असल्याने पुलावर अनेक वाहने अडकली होती. त्यामुळे लोकल मिळावी म्हणून पायीच प्रवास करून रेल्वेस्थानक गाठावे लागले. एकीकडे उकाडा आणि त्यात कोंडीमुळे हाल होत आहेत.
- रॉबी रेमेडियस, प्रवासी
------------
यामुळे कोंडीत भर
अंबाडी येथे दोन उड्डाण पूल आहेत, तर नवघर पूर्वेला जाण्यासाठी जुन्या उड्डाण पुलाचा वापर केला जातो. मात्र पश्चिम, पूर्व जोडणाऱ्या एका पुलावर अवजड वाहनांना बंदी असल्याने एका पुलावर अधिक भार येतो व कोंडीचे स्वरूप रोज निर्माण होत असते.
------------
विद्यार्थी वर्गाचे हाल
वसई पूर्वेकडील विद्यार्थी हे बसने पश्चिम परिसरात शाळेत येत असतात. मात्र या वाहतूक कोंडीमुळे या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे शाळेत जायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
------------
सिग्नल यंत्रणा कुचकामी
वसई-विरार महापालिकेने शहरात सिग्नल यंत्रणा बसवली आहे. मात्र अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे सिग्नल बंद असतात. अशातच वाहने धावतात व कोंडी होत असते. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.
------------
कोंडी कुठे ?
नवघर पूर्व
जुना उड्डाणपूल
रेंज ऑफिस
फादरवाडी
गोखिवरे
वालीव
सातिवली
वसंतनगरी
एव्हरशाईन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com