चारा उत्पादनातून आर्थिक पाठबळ

चारा उत्पादनातून आर्थिक पाठबळ

विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्येक वेळी शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेगळी वाट धरली असून अनेक शेतकरी हे चारा शेतीकडे वळले आहेत. वातावरणाचा कोणताही परिणाम चारा पिकावर होत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात हिरवा चारा विकून विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्याला रोजगार मिळू लागला आहे.
मुंबई, वसई फाटा, विरार तसेच तालुक्यातील इतरत्र असलेल्या दूध प्रकल्पातील म्हशींसाठी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. हा चारा नाशिकसारख्या ठिकाणाहून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च होत असल्याने या चऱ्याची किंमतदेखील वाढते; मात्र विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या तबेलेवाल्यांची गरज लक्षात घेऊन चारा शेतीला सुरुवात केली आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये विशेष करून मका आणि ज्वारी पिकाची सर्वांत जास्त पेरणी करण्यात आली आहे. साधारण तीन ते साडेतीन रुपये किलो दराने हा हिरवा चारा विकला जातो.


----------------
दुधाच्या प्रमाणात वाढ
मका आणि ज्वारी हे लवकर वाढणारे, रुचकर, उत्तम उत्पादन देणाऱ्या चाऱ्याची पिके आहेत. हिरव्या चाऱ्यासाठी मक्याचे आणि ज्वारीचे पीक वर्षभर घेता येते. उन्हाळ्यात त्यांचे उत्पादन जास्त येते आणि वाढही लवकर होते. दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाणही या हिरव्या चाऱ्यामुळे चांगले वाढते. मका आणि ज्वारी पिकात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याने कोणत्याही अवस्थेत जनावरांना दिले तरी त्याचा कोणताही परिणाम होत नाही.


-----------
चाऱ्याच्या विकसित जाती
मका आणि ज्वारी पिकाच्या जातीप्रमाणे चाऱ्याचे उत्पन्न भिन्न येते. मक्याची आफ्रिकन टॉल आणि ज्वारीची एसएसजी १० या निव्वळ चाऱ्यासाठी विकसित केलेल्या उत्तम जाती आहे. या जातीपासून योग्य व्यवस्थापनाखाली दिवसाला प्रतिअडीच एकर जागेत एक टन हिरवा चारा उत्पादन मिळते. म्हणजेच ६५ ते ७० दिवसांत प्रतिहेक्टर ६५ ते ७० टन हिरवा चारा मिळतो. म्हणजेच कमी मेहनतीत हेक्टरी २१ ते २५ हजार रुपये नफा शेतकऱ्यांना मिळत आहे.

-------------------
कापणीचा कालावधी, मूरघास
बहुतेक सर्वच चाऱ्यांची पिके ५० टक्के फुलोऱ्यात असताना कापली जातात. अशा अवस्थेत भरपूर चारा उत्पादन मिळते. शिवाय चाराही पौष्टिक, रुचकर व रसाळ असतो. या अवस्थेच्या नंतर उशिरा कापणी केल्यास उत्पन्न व गुणवत्ता कमी होऊ लागते. पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी कापणीस सुरुवात करावी. पीक घट्ट दुधाळ अवस्थेला येईपर्यंत कापणी संपवावी. गरजेपेक्षा हिरवा चारा जास्त झाल्यास त्यापासून मूरघास तयार केला जातो. म्हणजे उत्तम हिरवा चाऱ्याचे सर्व गुणधर्म व घटक टिकून राहतील व गरजेच्या वेळी असा चारा सुकवला जाऊन नंतर वापरात आणता येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com