‘पोटदुखी’साठी आपला दवाखाना

‘पोटदुखी’साठी आपला दवाखाना

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली कामे वेगाने सुरू असून राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. हे बघून अनेकांच्या पोटात दुखत आहे. त्यावर उपचार करण्यासाठीदेखील मुंबईत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून, त्या ठिकाणी मोफत उपचार घ्यावेत, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

ठाण्यातील टेंभी नाका आणि ठाणे जिल्हा रुग्णालयाचे एक वेगळे नाते आहे. जिल्ह्यात संघटना वाढवण्यात जिल्हा रुग्णालयाचे योगदानही मोठे असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले. कोरोना काळातदेखील जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अनेकांना जीवदान मिळाले आहे. यापुढे जिल्ह्यातील एकाही रुग्णाला मुंबईत जाण्याची गरज पडणार नसून सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून सर्व उपचार एकाच छताखाली होणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच ठाण्यात कॅन्सर हॉस्‍पिटलची निर्मिती केली जाणार असल्याचेदेखील त्‍यांनी या वेळी सांगितले.
.......................................

रुग्णालयाच्या कामात दिरंगाई नको
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम निर्धारित वेळेच्या आधी म्हणजे १५ महिन्यांत पूर्ण केल्यास बोनस दिला जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले. तसेच कोणत्याही विभागाने या रुग्‍णालय निर्मितीच्या कामात दिरंगाई केल्यास खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगत संबंधित विभागांनाही या वेळी तंबी देण्‍यात आली.
...............................

रुग्णालयाच्या कामाचा आढावा : तानाजी सावंत
काही महिन्यांपूर्वी हाफकिनच्या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची खिल्ली उडवण्यात आली होती. त्याचा समाचार त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमात घेतला. जिल्हा रुग्णालयाचे काम हे १८ महिन्यांत पूर्ण झालेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी मी वेगळ्या पद्धतीने काम करीत असून प्रत्येक महिन्याला आढावा घेणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. मी संशोधक असल्याने आता आरोग्य विषयाचे प्राधिकरण तयार करीत आहे. येत्या १० दिवसांत ते प्राधिकरण अस्तिवात येईल, असेही ते म्हणाले.
..................
एकीकडे विकास सुरू; ग्रामीणमध्ये असुविधा : कपिल पाटील
एकीकडे विकास सुरू आहे; तर ग्रामीणमध्ये सुविधा मिळत नसल्याची खंत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी या वेळी व्यक्त केली. बदलापूरचे रुग्णालय १०० बेडचे करावे. शहापूर उपजिल्हा रुग्णालय करावे, खर्डी येथे ट्रॉमा सेंटर सुरू करावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com