आली लग्नघटी समीप

आली लग्नघटी समीप

विरार, ता. २९ (बातमीदार) : कोरोना काळात विवाहावर अनेक बंधने होती. ती बंधने आता दूर झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नाचे बार उडवण्यात येत आहेत. या ‘आली लग्नघटी’ कार्यक्रमाला मात्र तीव्र उन्हाच्या झळा वऱ्हाडी लोकांना सोसाव्या लागत आहेत. असे असले तरी मे महिन्यात १४ लग्नाचे मुहूर्त असून या सर्वच तारखा बुक झाल्या आहेत. त्यामुळे वाजंत्री, हॉल, भटजी, मंडप डेकोरेटर्स यांची मागणीही वाढली आहे.
यंदा मे महिन्यात विवाह सोहळ्यासाठी एकूण १४ मुहूर्त असणार आहेत. त्यात मुहूर्ताची तारीख ठराविक असल्याने एकाच मुहूर्तावर अनेक विवाह सोहळ्यांचे बार उडणार आहेत; मात्र यंदाचा उन्हाळा प्रखर असल्याने वऱ्हाडी मंडळींना लग्न समारंभाला जाणे म्हणजे प्रखर उष्म्याचा सामना करावा लागणार आहे. यंदा मे महिन्यात विवाह सोहळ्याची लगबग असल्याने मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, स्वयंपाकी, वाजंत्री मिळणे मुश्कील झाले आहे. आधीच तारखा निश्चित झाल्याने विवाहास उपयुक्त असलेल्या सर्व मंडळींच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे विवाह सोहळा जवळ आला असताना बहुतेक वधू-वर पक्षांकडील मंडळींना वाजंत्री, स्वयंपाकी, मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू आहे.

------------------------------
भटजी, डेकोरेटर्सच्या तारखा फुल्ल
सध्या उन्हाची दाहकता प्रखर असल्याने मंडप डेकोरेटर्स यांना महत्त्व आले आहे. एकाच महिन्यात जास्तीत जास्त सुपाऱ्या मिळत असल्याने या मंडळींच्या तारखा फुल्ल झाल्या आहेत. अनेक नागरिकांना तर मनाजोगे मंडप, वाजंत्री, स्वयंपाकी मिळालेले नाहीत. बऱ्याचदा विवाह सोहळ्यात थाट मिरवण्याकडे वधू व वर पक्षांकडील मंडळींचा कल असतो; मात्र आताच्या उन्हाळ्यात विवाह सोहळे ठराविक मुहूर्तावर असल्याने काही ठिकाणी एकाच दिवशी दोन ते तीन विवाह सोहळे असल्याने वऱ्हाडी मंडळींना मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागणार आहे. त्यात वाढलेला उन्हाळा यामुळे नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

-------------
शीतपेये विक्रेत्यांची सुगी
लग्न समारंभांत जेवणासोबत बऱ्याच ठिकाणी मठ्ठा देण्याची पद्धत आहे. थंड मठ्ठा विक्रेत्यांना यामुळे सुगीचे दिवस आले आहेत. थंड पेये, पाणी, सरबत, ताक यांना या वेळी विवाहात जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. शिवाय लग्न मंडपाबाहेर आईसक्रीमचे स्टॉल लावल्यामुळे त्यांनाही रोजगार मिळत आहे. सध्या वसई-विरारमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने आटोपशीर पद्धतीने लग्न करण्यावर भर देण्यात येत आहे. डोक्यावर उन्हाच्या प्रखर ज्वाळा असल्याने श्यक्यतो एसी हॉलची मागणी वाढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वधू-वराच्या खर्चातही वाढ झालेली दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com