मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात वाढ

मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात वाढ

भाईंदर, ता. १ (बातमीदार) : स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. आता गेल्या काही दिवसांपासून मिरा-भाईंदरच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली होती. त्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यातच एमआयडीसीकडून घेण्यात येणाऱ्या शटडाऊनमुळे, तसेच जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर स्टेम, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना महापालिकेत पाचारण करण्यात आले होते. मिरा-भाईंदरच्या पाणीपुरवठ्यात तातडीने वाढ झाली नाही तर स्टेम आणि एमआयडीसीच्या ठाणे येथील कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी देखील पाणी कमी देण्यात येत असल्याबद्दल शहरात आंदोलन केले होते. कोविड काळात हे आंदोलन केल्याबद्दल शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळीही एमआयडीसी आणि स्टेमच्या अधिकाऱ्यांना महापालिकेत पाचारण करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पाणीपुरवठ्यात वाढ झाली होती. मात्र अवघ्या सहा महिन्यांत कपात करण्यात आली. त्यामुळे सध्या झालेली वाढ कायमस्वरूपी टिकणार की वातावरण निवळल्यानंतर पुन्हा कपात होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उद्योगमंत्र्यांच्या आदेशालाही हरताळ
एमआयडीसीकडून मिरा-भाईंदरसाठी १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे; परंतु शहराला ११० दशलक्ष लिटर पाणीच दिले जात होते. डिसेंबर महिन्यात शहराला पाच दशलक्ष लिटर पाणी वाढवून देण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. या आदेशानंतर सुमारे तीन महिने पाणीपुरवठ्यात वाढ झाली. मात्र त्यानंतर एमआयडीसीने पुन्हा पाणी कपात करून ती दैनंदिन १०७ ते १०८ दशलक्ष लिटर पुरवठ्यावर आणली.

१२ ते १४ दशलक्ष लिटर कमी पुरवठा
स्टेमकडून ८६ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना मिरा-भाईंदरला ७२ ते ७४ दशलक्ष लिटर पाणीच दिले जात होते. महापालिकेच्या चेणा येथील मीटर नोंदीनुसार हे सिद्ध झाले होते.

ऐन उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा
आता स्टेम प्राधिकरणाकडून ७८ ते ७९ दशलक्ष लिटर व एमआयडीसीकडून ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com