Mumbai : जिल्हाधिकारी कार्यालयात रोज ‘लोक दरबार’ भरणार; पालकमंत्री लोढा
मुंबई - सामान्य जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘लोक दरबार’ भरवला जाईल. या वेळी अन्य विभागाच्या तक्रारीही स्वीकारल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात लोढा यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले, या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई उपनगर पालकमंत्री लोढा यांनी या वेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सेनानी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शासन सेवेत नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
त्याचप्रमाणे सन २०२१-२२ च्या जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण पालकमंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे यांच्याकडून मंडळातील कार्यरत सुरक्षा पर्यवेक्षक राजेश व्ही. सावंत, सुरक्षा रक्षक संदीप पी. भेलकर, आर. वी. नायर आणि सहायक सुरक्षा अधिकारी व्ही. के. बनकर यांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी प्रोत्साहनपर मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.