खेकडा प्रवृत्ती सोडली तरच प्रगती

खेकडा प्रवृत्ती सोडली तरच प्रगती

कासा, ता. २ (बातमीदार) : मराठा समाजामध्ये खेकडा प्रवृत्ती आहे ती सोडली पाहिजे. समाजातील बांधव, मित्र यांना मदत केली पाहिजे. आपसातील भांडणे कमी केली पाहिजेत. समाजाला एकत्र आणले पाहिजे. खेळामध्ये विद्यार्थ्यांना पुढे नेले पाहिजे. पालकांनीदेखील आपल्या मुलांना केवळ डॉक्टर, इंजिनिअर, वकील व्हावे असे न करता त्यांच्या कलेप्रमाणे त्यांना क्षेत्र निवडू द्यावे, असे प्रतिपादन डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी केले.
डहाणू तालुक्यातील मराठा न्याती मंडळाचा ५५ वा वर्धापनदिन सोहळा डहाणू येथील सेंट मेरीज हायस्कूलच्या प्रांगणात सोमवारी (ता. १) आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमात मराठा समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. त्याचबरोबर आपल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या समाजातील नागरिकांचादेखील सत्कार केला जातो. या वेळी उद्योग क्षेत्रात कार्यरत असणारे अभिषेक कदम हेदेखील उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंडळाच्या कार्याविषयी मंडळाचे अध्यक्ष वत्सल चव्हाण यांनी माहिती दिली; तर सचिव मनीष माने यांनी अहवाल सादर केला. या वेळी अभिषेक कदम यांनीही मार्गदर्शन केले.

‘जाणता राजा’चे सादरीकरण
महाराष्ट्राचे प्रेरणाशक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘जाणता राजा’ नाट्य सादर करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते महाराष्ट्राचे शौर्य, राज्याभिषेक यातील प्रसंग दाखवण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवकाळात गेल्याचा भास निर्माण झाला. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात डहाणू, घोलवड, कासा, वानगाव या भागातील मराठा समाजबांधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com