रिक्षाचालकांची मनमानी भाडेवाढ

रिक्षाचालकांची मनमानी भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : शहरात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी तसेच काही रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे सुरू असल्याने बहुतांश रस्त्यावरील वाहतूक ही इतर मार्गांनी वळविण्यात आली आहे. वाहतूक मार्गातील बदल हे रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडले असून रिक्षाचालकांनी शेअर भाडे दरात वाढ केली आहे. ही वाढ तब्बल पाच ते आठ रुपयांची आहे. तसेच काही मार्गात तर चालकांनी चक्क दहा रुपयांची वाढ केली आहे. मनमानी पद्धतीने दर आकारणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात आरटीओ प्रशासन कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डोंबिवली शहरात रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेला मानपाडा रस्त्याचेदेखील काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ही पिंपळेश्वर मंदिर मार्गे वळवण्यात आली आहे. वाहतुकीत बदल केल्याचे कारण सांगत रिक्षाचालकांनी मनमानी पद्धतीने पाच ते सात रुपयांनी रिक्षा भाडे दरात वाढ केली आहे. मानपाडा जायचे असल्यास रिक्षाचालक २५ ते ३० रुपये आकारत आहेत. पूर्वी २२ रुपये प्रवाशांकडून आकारले जात होते. तसेच स्टेशन ते देसलेपाडा, नवनीत नगर येथे जायचे असल्यास ३० रुपये शेअर रिक्षाचे घेतले जात आहेत. पूर्वी २२ ते २३ रुपये प्रवासी भाडे आकारले जात होते. स्टेशनपासून ज्या भागात २० ते २२ रुपये आकारले जात होते, तेथे चालकांनी ३० रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे; तर थेट रिक्षा केली असता ज्या ठिकाणी ३० रुपये घेतले जायचे, त्याच अंतरासाठी आता ४० रुपये आकारले जात आहेत. या मनमानी पद्धतीच्या भाडेवाढीला ग्राहक वैतागले आहेत. वारंवार तक्रार करूनही आरटीओ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तसेच कारवाईदेखील सातत्याने होत नसल्याने रिक्षाचालकही आरटीओच्या कारवाईला जुमानत नाहीत. उन्हाचे दिवस असल्याने अनेक प्रवासी हे पायी प्रवास करण्याऐवजी रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र ही भाडे वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नसल्याचे ग्राहक सांगतात.
....
नियमबाह्य रिक्षांवर कारवाई नाही
फेरिवाल्यांविरोधात मनसेने डोंबिवलीत आंदोलन छेडले होते. त्यानंतर स्टेशन परिसरातील वाहन कोंडी फोडणे यासाठी रिक्षा तळाची पाहणी करण्यात आली होती. यावेळी आरटीओ अधिकारीदेखील डोंबिवलीत आले होते. डोंबिवलीत येताच सायंकाळी अधिकाऱ्यांनी अचानक स्टेशन परिसरात धाड टाकत नियम बाह्य रिक्षांवर कारवाई केली. त्यानंतर मात्र पुन्हा तशी कारवाई शहरात झाली नाही. या कारवाईत सातत्य नसल्याने रिक्षा चालकांचे फावत असल्याचे बोलले जात आहे.
.....
रिक्षाच्या भाडेदरात वाढ करण्यात आली आहे. याविषयी प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात सातत्याने वाद होतात. आरटीओ कर्मचाऱ्यांकडे तक्रार करुनही ते काहीही कारवाई करत नाही. सातत्याने कारवाई झाल्यास रिक्षाचालकांवर वचक निर्माण होऊन नियमात वाहतूक होईल, तसेच दर ही वाढ केली जाणार नाही. नियमात राहून काम करावे त्याला प्रवाशी ही सहकार्य करतील.
- दीपक जगताप, प्रवासी
....
आमच्याकडे भाडे वाढवल्यासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरटीओकडून कारवाई करण्यात येईल.
- विनोद साळवी, प्रभारी अधिकारी, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com