
नियुक्तीसाठी उमेदवारांचे उपोषण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः महावितरण विभागाने २०१९ मध्ये उपकेंद्र सहायक (आॅपरेटर) २३०० पदांची भरतीबाबत १,०२९ मुलांची वेटिंग लिस्ट जाहीर केली. त्यापैकी ७५७ उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यानंतर पाच वर्षे होऊनही नियुक्ती मिळत नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या युवकांनी सोमवारपासून (ता. ३०) आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे.
वर्ष २०१९ मध्ये या उमेदवारांची परीक्षा झाली. कोरोना महामारीमुळे आणि सत्तांतरामुळे दरम्यानच्या काळात जून २०२० मध्ये निकाल लावण्यात आला आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान मराठा आरक्षणामुळे स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ९ सप्टेंबर २०२० मध्ये एसईबीसी आणि आर्थिक मागासवर्गीयांना वगळून पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र त्यानंतर आता महावितरण विभागाने समांतर आरक्षण लावून प्रतीक्षा यादीतील ७५७ उमेदवारांना गेल्या पाच वर्षांपासून नियुक्त्याच दिल्या नाहीत. सध्या महावितरण विभागात उपकेंद्र सहायकपदाच्या ७,००० पेक्षा अधिक जागा रिक्त आहे. त्यामुळे ७५७ उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या उमेदवारांकडून केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील भय्या कुडमाथे याची नियुक्ती मिळत नसल्याने मानसिकता खराब झाली आहे. मंगळवारी तो भोवळ येऊन पडल्याने त्याला जीटी रुग्णालयात भरती करण्यात आले.
...
राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देणाऱ्या सभागृहात लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासनसुद्धा दिले. त्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊ नये, लाजीरवाणी गोष्ट आहे. गोरगरीब शेतकऱ्यांची आम्ही मुले आहोत. नोकरीच्या प्रतीक्षेत असल्याने लग्नसुद्धा जुळत नाहीत. सरकारने आम्हाला न्याय द्यावा.
- विजय डोंगरे, आंदोलक उमेदवार