
वादळी वाऱ्याने घरे, झाडे कोसळली
वज्रेश्वरी, ता. ३० (बातमीदार) : भिवंडी तालुक्यात मंगळवारी (ता. ३०) दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारा सुरू होऊन अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागासह पडघा-बोरिवली भागात सर्वाधिक फटका बसला आहे. या भागातील अनेक घरांची छपरे उडून नागरिकांचा संसार उघड्यावर पडला. शिवाय वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उमळून पडली. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार विटांवर प्लास्टिक झाकण्यासाठी वीट उत्पादकांची मोठी धावाधाव झाली होती. अनेक वीटभट्टी मालकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्याने शासनाने वीटभट्टी मालकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादकांकडून होत आहे. दुसरीकडे वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीला फटका बसून वाहतूक मंदावली आहे.
---------------
रस्त्यांवर पाणी साचले
मार्च महिन्यात तीन वेळा अवकाळी पावसाने याच भागाला जोरदार झोडपले होते. त्या वेळी पावसामुळे पिकांसह फळबागांची नासाडी झाली होती. मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते; तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते. या चिखलमय रस्त्यांतून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती.