तळियेतील घरांचे बांधकाम पूर्ण

तळियेतील घरांचे बांधकाम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १ : महाड तालुक्यातील तळिये गाव अतिवृष्टीत जुलै २०२१ दरडीखाली गेले होते. दरडग्रस्तांना ‘विशेष बाब’ म्हणून ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची घरे देण्यात येणार असून आतापर्यंत अनेकवेळा घर देण्याच्या डेडलाईन देण्यात आल्या होत्या. परंतु दरडग्रस्तांचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन वर्षात ४४ घरांचे काम पूर्ण झाले असून ही घरे अद्यापपर्यंत दरडग्रस्तांच्या ताब्यात देण्यात आलेली नाहीत. पावसाळ्यापूर्वी ही घरे मिळावीत, अशी अपेक्षा दरडग्रस्‍तांना आहे. ज्यांची घरे पूर्णपणे दरडीखाली गाडली गेली, अशा ६६ कुटुंबांना ही घरे देण्यात येणार आहेत.
२२ जुलै २०२१ च्या दुर्घटनेनंतर ‘म्हाडा’ने हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याबाबत कालबद्ध कार्यवाही करून काही दरडग्रस्‍त कुटुंबांना १ मे २०२२ मध्ये घरांचा ताबा देण्याचा प्रयत्न म्हाडा करत असल्याचे आश्वासन तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले होते. त्यानंतर आलेल्या सरकारने याकडे फारसे लक्ष न दिल्याने हे काम संथ गतीने सुरू असल्‍याचे दरडग्रस्तांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे सध्या तात्पुरत्या घरात त्‍यांचा निवास आहे.
कोकणात वारंवार येणारी वादळे, पूर, अतिवृष्टी अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये प्री-फॅब्रिकेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेली घरे सर्व आपत्कालीन परिस्थितीत अनुकूल ठरतील, अशा पद्धतीने बांधण्यात येत आहे. या तंत्रज्ञानातून ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून गाव विकसित करण्यात येत असून पाणी, वीज, रस्त्‍यासह शिक्षण, आरोग्य सुविधाही देण्यात येणार आहेत.

उन्हाळ्यात दरडग्रस्तांच्या यातना
दरडीमध्ये घर गेली म्हणून शासनाने पत्र्याचे कंटेनर दिले. सद्या या तात्पुरत्या निवारा शेडमध्ये २५ दरडग्रस्त कुटुंब राहतात. पाणी टंचाई, त्‍यात पत्र्याच्या कंटेनरमध्ये बसणारे उन्हाचे चटक्‍यांमुळे दरडग्रस्‍त हैराण झाले आहेत. सरकारने पाणी आणि पक्की घर लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी तळिये दरडग्रस्त करीत आहेत. सकाळी दहा वाजलेपासून उन्ह तापते, त्यामुळे पत्र्याच्या घरात थांबणे त्रासदायक होते, दुपारी तर रखरखत्या उन्हात ही घरे सोडून झाडाचा आधार घ्यावा लागतोय. लहान मुले, वृद्ध अधिक कासावीस होत असल्‍याचे गावातील महिलांनी सांगितले.

तळिये गावातील कोंडाळकर वाडी २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीत पूर्णपणे गाडली गेली. म्हाडाकडून प्राधान्यक्रमाने यातील ६६ कुटुंबांना नवी घरे बांधून देण्यात येत आहेत. सध्या यातील ४४ घरांचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी घरात राहण्यासाठी जाता यावे, अशी ग्रामस्थांकडून व्यक्‍त होत आहे.
- किशोर पाटील, मंडळ अधिकारी, तळीये

तळियेतील ४४ घरांमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. थोड्याफार अपूर्ण राहिलेल्या कामांचा पाठपुरावा गावाला भेट दिल्यानंतर केला जाईल. पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्तांना घरात राहण्यासाठी जाता यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरडग्रस्तांना घराचा ताबा देण्यात येईल.
- डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com