उल्हासनगरात शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना मदतीचा हात, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना मदतीचा हात,
उल्हासनगरात शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना मदतीचा हात,

उल्हासनगरात शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना मदतीचा हात,

sakal_logo
By

शेतकऱ्यांच्या मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उल्हासनगर (वार्ताहर) : कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना उल्हासनगरातील शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. या मुलांकडे अनेक महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुपूर्द करण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे यांच्या पुढाकाराने नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ अनाथ आश्रमात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांना साखर, तांदूळ, पीठ, डाळी, पोहे, गोडेतेलाचे डबे, बिस्किटचे पुडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. विठ्ठलवाडी शिवसेना शाखेच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहर संघटक नाना बागुल, उपशहरप्रमुख माजी नगरसेवक विजय पाटील, सुरेश सोनवणे, आयोजक उपशहरप्रमुख बाळा श्रीखंडे, उत्तरभारतीय शहर संघटक के. डी. तिवारी, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, विभागप्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे, महेंद्र पाटील, जावेद शेख, पप्पू जाधव, हरी पवार उपस्थित होते.

वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष पंचांग पुस्तकरूपी वाणाची देवाण
ठाणे (बातमीदार) : वटपौर्णिमेनिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात वडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा केली जाते. ही वृक्षतोड थांबावी, यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांकडून आवाहन केले जाते. त्यासाठी विविध उपक्रमही राबवले जातात. यंदाही ठाण्यातील राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशनच्या महिलांनी वृक्ष पंचांग पुस्तकरुपी वाण देऊन वटपौर्णिमा साजरी केली. ''ती वसुंधरा मी वसुंधरा'' या संकल्पनेवर आधारित राज्ञी वुमन वेल्फेअर असोसिएशन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकत्रित येऊन विविध उपक्रम राबवत असते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एकमेकींना भारतीय वृक्षांची माहिती देणारे वृक्ष पंचांग पुस्तक रूपी वाण देऊन सर्व राज्ञी सभासद महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. वृक्षपूजन करून वृक्षतोड करणार नाही. फांदी तोडून त्याची पूजा करणार नाही, अशी शपथ महिलांनी घेतली.

डोंबिवलीत राज्याभिषेक गौरव दिन सोहळा
डोंबिवली (बातमीदार) : डोंबिवलीत ३५० वा राज्याभिषेक गौरव दिन सोहळा शुक्रवारी (ता. २) मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेक गौरव दिन सोहळा शिवसेना डोंबिवली शहर शाखा व स्वामी विवेकानंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झाला होता. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमातील जलासह महाराजांवर दुधाभिषेकासह मंत्रोपचार, तुतारी ढोलताशा वाजंत्रीच्या गजरात राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवसेना शाखाप्रमुख राजेश मोरे, शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, उपजिल्हाधिकारी राजेश कदम, स्वामी विवेकानंद सेवा मंडलाचे श्रीपाद जोशीसह इतर मान्यवर उपस्थित होते.