
खांजण जमिनीत वृक्षारोपण
डहाणू, ता. ५ (बातमीदार) : खाजण जमिनीत असणारे कांदळवन म्हणजे समुद्रात जाणारे प्रदूषित पाणी शुद्ध करणारे कारखाने आहेत. त्या दृष्टीने खाजण जमिनीत तिवराची झाडे लावून त्याचे संवर्धन केल्यास त्या ठिकाणी माशांची उत्पत्ती होऊन समुद्राचे पाणी शुद्ध होण्यास मदत होईल, असे विचार डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी मांडले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज (ता. ५) आसनगाव, माटगाव येथे कांदळवन वृक्षारोपण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
डहाणू वनविभागातील बोईसर वनपरिक्षेत्रांतर्गत आसनगाव माटगाव येथे कांदळवन वृक्षारोपण महोत्सवाचे उद्घाटन आमदार विनोद निकोले आणि आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत, तहसीलदार अभिजीत देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, देवानंद शिंगडा, सहायक वनसंरक्षक जी. व्ही. सानप, बोईसर वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्ही. साटम, प्रा. भूषण भोईर आदी उपस्थित होते. कांदळवनाचे आणि समुद्राचे अतूट नाते असून, कांदळवन लागवड करून त्या झाडांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे प्रा. भूषण भोईर यांनी सांगितले. या वेळी उपस्थितांनी खाजण जमिनीत कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर लागवड करून, त्याची जोपासना करण्याचा निर्धार व्यक्त केला.