शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा

शेतकऱ्यांच्या पावसाकडे नजरा

Published on

डहाणू, ता. १८ (बातमीदार) : या वर्षी पावसाला लवकर सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला आहे. मृग नक्षत्र सुरू होताच ११ जूनपासून वादळी वाऱ्याबरोबरच पावसाचे आगमन झाल्याने काही शेतकऱ्यांनी भात बियाणे पेरणीला सुरुवात केली. मात्र आता आठ दिवसांचा कालावधी लोटला. पावसाला सुरुवात न झाल्याने वरुणराजा कधी बरसणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच प्रचंड उकाडा वाढल्याने अंगातून घामाच्या धारादेखील वाहू लागल्या आहेत.

थोड्या पावसात काही शेतकऱ्यांनी भात-बियाणे पेरण्या केल्या आहेत. तालुक्याच्या अनेक भागांत वरुणराजाने हजेरी लावली नसल्याने शेतकरी पेरणीसाठी खोळंबले आहेत. या भागात शेतकरी प्रामुख्याने भात पीक घेतात. मागील वर्षी या भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडला होता. मात्र या वेळी अजून पाऊस पडला नसल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसला आहे. आधीच पेरणी करावी तर जर पाऊस उशिरा पडला तर बी वाया जाणार आणि दुबार पेरणी करावी लागेल, अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

बियाणे, खतांच्या किमतीत वाढ
जमीन पेरणीसाठी तयार करायची ठरली तर वाढत्या महागाईमुळे मोठा खर्च येतो. बी-बियाण्यांचे दर वाढले असून रासायनिक खतांच्या किमतीही वाढल्याने काय करावे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या धास्तीने अनेक शेतकरी हातावर हात देऊन पावसाची वाट बघत असल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे.

रोजंदारीवरील कामगारही हैराण
वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होताना नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उष्णतेने घामाच्या धारा निघत आहे, तर रात्री वारा सुटत असल्याने काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस नसल्याने रोजंदारीवर कामाला जाणाऱ्यांच्या हाताला काम नसल्याने ते कामगारही कधी एकदा पाऊस पडतो, या आशेने रोज आभाळाकडे नजरा लावून आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.