महावितरणावर तक्रारींचा पाऊस

महावितरणावर तक्रारींचा पाऊस

Published on

घणसोली, ता. २६ (बातमीदार)ः गावात विजेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विविध आंदोलने, निवेदने, तक्रारी करूनहील महावितरणचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सुनियोजित शहर म्हणून नावलौकिक असलेल्या शहरांची अशी अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या घणसोलीकरांनी समाज माध्यमांवरूनच महावितरणला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.
घणसोली गावातील वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या प्रकाराने सर्व सोयीसुविधा असूनही त्यापासून वंचित राहण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून २४, ४८ तास तर कधीकधी ३-४ दिवसही वीज नसल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्री-अपरात्री उठून महावितरणचे कार्यालय गाठावे लागत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत विजेची मागणी पुरवण्यास महावितरण असमर्थ ठरत असल्याने घरातील इलेक्ट्रिक वस्तू खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मुलांचा अभ्यास, पाण्याचे प्रश्न या समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने घणसोली ग्रामस्थांनी समाज माध्यमांवरच महावितरणविरोधात तक्रारींचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.
-------------------------------------------
पाच सदस्यांच्या समितीचे गठण
घणसोली विभागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तसेच निर्माण झालेल्या समस्या याचा तांत्रिकदृष्ट्या सखोल अभ्यास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली विभागातील पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने महावितरणमार्फत पाच सदस्य कमिटी स्थापन करण्यात आली असून विभागातील हाय टेन्शन केबल्स, ट्रान्सफॉर्मर, फिडर हॉक्स याची पाहणी करण्यात येणार आहे.
---------------------------------------------------
थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
घणसोलीत अनेकांच्या घरात जनरेटर आहे. मात्र, जनरेटर दोन तासही चालत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. महत्त्वाचे म्हणजे, विजेची देयके भरली नाहीतर मीटर कापायला महावितरणचे अधिकारी वेळेवर येतात. मात्र वीजपुरवठा सुरळीत करायला महावितरणचे कर्मचारी कमी पडत असल्याने या प्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे.
-------------------------------------------
घणसोली गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. दिवसातील १२ तासही नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. यासाठी अनेक निवेदने दिली, अनेक मोर्चे काढले; परंतु हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
- स्वप्नील मढवी, उप-विधानसभा युवा अधिकारी, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.