डांबराच्या रस्त्यावर भेंडीचे उत्पन्न

डांबराच्या रस्त्यावर भेंडीचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : डांबरावर सिमेंटचा मुलामा चढवत रस्ता बनविल्याचे तंत्रज्ञान आपण आतापर्यंत पाहिले आहे. मात्र डांबराच्या रस्त्यावर शेती करत त्यातून भेंडीचे पीक घेतल्याचा प्रकार वसार गावात उघडकीस आला आहे. बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळ शेतकरी आणि एमआयडीसी यांच्यात भूसंपादनावरून वाद असल्याने एक मार्गिका गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेत शेती करण्यास सुरुवात करत विविध फळभाज्यांची लागवड रस्त्यावरील शेतीत केली. यातून आता शेतकऱ्यांनी भेंडीचे पीक घेतले आहे. लवकरच कारल्याचेदेखील पीक या शेतीतून घेणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावातील शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसी पाईपलाईन व रस्ता यात बाधित झाली आहे. एमआयडीसीने केलेले भूसंपादन आणि रस्त्यात गेलेली जमीन यात तफावत आढळून आल्याने वसार गावातील शेतकऱ्यांनी हक्काच्या जागेसाठी लढा देण्यास सुरुवात केली आहे. एमआयडीसी प्रशासनासोबत चर्चा करूनही काही तोडगा निघत नसल्याने तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काची जमीन ताब्यात घेत रस्त्यावरील एक मार्गिकाच बंद केली. एमआयडीसी अधिकाऱ्यांनी हा रस्ता चालू करण्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या कामातील तफावत आणि शेतकऱ्यांचा विरोध यामुळे त्यांना माघारी जावे लागले. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काच्या जागेत डांबराच्या रस्त्यावर शेती करत पीक घेण्यास सुरुवात केली. विविध फळभाज्यांची लागवड शेतकऱ्यांनी रस्त्यावर केल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

उद्योग मंत्र्यांच्या आदेशाकडे कानाडोळा
जुलै महिन्यात आमदार गायकवाड यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्रामस्थांसह भेट घेत यावर तोडगा काढण्याविषयी विनंती केली होती. त्यानुसार वसार येथील जमिनीची उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करून महामंडळाच्या प्रत्यक्षात जलवाहिनी व सेवा रस्ता या खालील क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्र वगळणे योग्य असल्यास मूळ मालकाला ते परत करण्याचे निर्देश दिले, पण यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

एमआयडीसीने मोजणी अर्जात फेरफार करत पोट हिस्सा मोजणी अर्ज करून त्यासंदर्भात ऑनलाईन नोटीस शेतकऱ्यांना पाठविण्यात आली आहे. या पोट हिस्सा मोजणीस आमची हरकत आहे.
- लहू वायले, शेतकरी

जागेचा तिढा कायम असताना या शेतीत भाज्यांचे उत्पादन निघाल्याने रस्त्यावरून जाणारे वाहनचालक आश्चर्य व्यक्त करत आहेत. शेतीतून पीकदेखील आले; परंतु रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. यावरून आपले प्रशासन किती तप्तर आहे याची प्रचिती येत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक देतात. ही एक मार्गिका बंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. आजूबाजूला मोठमोठे ढाबे असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली न लावण्यामागे खरे गणित काय आहे ? याची चर्चा आता रंगू लागली आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरू असून हा प्रश्न आतातरी निकाली लावला जाणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com