मुंबईकरांचे मानसिक स्वास्थ बिघडले!

मुंबईकरांचे मानसिक स्वास्थ बिघडले!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : मुंबईत एकाच दिवशी ‘मानसिक’ तणावातून तीन मोठ्या घटना समोर आल्या. यात दोघांनी आत्महत्या केली; तर एकाने कामावर असताना संतापाच्या भरात चार जणांना गोळ्या घालून ठार केले. यातील दोन जण तिशीच्या आत आणि तिसरी व्यक्ती ५५ वर्षांची होती. मुंबईत कामाचा आणि मानसिक ताण इतर शहरांपेक्षा जास्त आहे. मुंबई ही ‘प्रेशर कूकर’सारखी असून आत्महत्यांची संख्याही दरवर्षी वाढत चालली आहे.

३० वर्षांचा चेतन सिंह या आरपीएफ जवानाने मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून चार जणांची हत्या केली. एवढ्या टोकाची भूमिका त्याने का घेतली, यामागचे कारण सांगताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विभावरी पाटील सांगतात, हा व्यक्ती खूप रागीट स्वभावाची होती. घरच्यांना सर्व माहिती असूनही त्याच्या रागाचे नीट व्यवस्थापन किंवा निचरा झाला नाही. हा संताप वाढत जाऊन त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल एवढी घृणा तयार झाली, की पुढच्याच्या जगण्याच्या अधिकार हिरावून घेताना त्याला काहीच वाटले नाही.

डॉ. विभावरी सांगतात, की अलिकडची तरुणाई आत्मकेंद्रीत स्वभावाची आहे. आम्ही कसेही वागू; मात्र आम्ही कुणालाही जबाबदार नाही, असेच त्याचे म्हणणे आहे. मला सुख मिळते ना मग पुढच्याच्या त्रासाचे काय, याचे भान सध्याची पिढी हरवून बसली आहे. यातून हे प्रकार घडत असल्याचे त्या म्हणाल्या.

केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी स्वतःला इंजेक्शन टोचून जीवन संपवले. याबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरिष शेट्टी म्हणाले, की अनेक जण वरवरून आनंदी वाटत असले तरी आतमधून ते मानसिकदृष्ट्या तुटलेले असतात. निवासी डॉक्टर सातत्याने काम करतात, अभ्यासाचा तणाव असतो. त्यांच्या मानसिक स्वास्थावर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध असणे तसेच २४ तास हेल्पलाईन असणे गरजेचे आहे; मात्र आपल्या व्यवस्थेत याची कमतरता आहे. तरीही एखाद्या मानसिक आघाताने माणूस खचू शकतो असे ते सांगतात.

५५ वर्षीय टिकम मखीजा यांनीही सी-लिंकवरून समुद्रात उडी घेतली. काही दिवसापुर्वी त्यांचा अपघात झाला होता. त्यात जखमी झाल्याने त्यांना नैराश्य आले होते. नैराश्य ओळखण्यात जवळच्या व्यक्तींना अपयश आले. समुपदेशनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे माणसे स्वतःला संपवण्यापर्यंतच्या निर्णयावर जातात, असे डॉ. विभावरी पाटील म्हणाल्या.

हा तर ‘वेक अप कॉल’
मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. येथे कोविडमध्ये पालिकेने घरोघरी नागरिकांची तपासणी केली. तसेच घरोघरी जावून मलेरिया, डेंगी रुग्णांची स्क्रिनिंग होते; मात्र एवढे बजेट असलेल्या पालिकेला मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याची तपासणी का करता येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईत आत्महत्यांची संख्या वाढत चालली आहे. हा ‘वेक अप कॉल’ असल्याचे डॉ. हरीश शेट्टी सांगतात. मुंबईत मानसिक आरोग्याच्या समस्या सांगण्यासाठी हेल्पलाईन व्यवस्थाही कमी असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
....
मुंबईतील आत्महत्या
वर्षे आत्महत्या
२०२१- १४३६
२०२०- १२८२
२०१९- १२२९
२०१८ - ११७४
२०१७- ११५५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com