पूल, जेटींमुळे पालघरमध्ये पर्यटन बहरेल

पूल, जेटींमुळे पालघरमध्ये पर्यटन बहरेल

Published on

पालघर, ता. २४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. राज्य सरकारकडून जिल्ह्यात जेटी आणि पूल बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. वसई तालुक्यातील मारबळ ते पालघर तालुक्यातील टेंभी खोडावे खाडीवर ६४५ कोटी खर्चाच्या पुलाला मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमुळे जिल्ह्यातील दळणवळणाला चालना मिळून पर्यटनवाढीस हातभार लागणार आहे, असा विश्‍वास पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी व्‍यक्त केला.

केळवे बीच पर्यटन महोत्सव २०२३ चे शुक्रवारी उद्‌घाटन झाले. त्या वेळी गावित बोलत होते. रविवारपर्यंत (ता. २६) हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्याला पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा, जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कोकण पर्यटन संस्थेचे संजय यादवराव आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

पालघर हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या देशपातळीवर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. झाई ते नायगाव हा ११२ किलोमीटरचा समुद्रकिनारा जिल्ह्याला लाभला आहे. या संपूर्ण किनारपट्टीवर पर्यटन वाढीस लागावे या दृष्टीने भाईंदर ते वसई आणि अर्नाळा ते कोरे या जेटींचे प्रस्ताव सरकारने मंजूर केले आहेत. येत्या दोन महिन्यात भाईंदर ते वसई जेटीचे काम सुरू होईल तर अर्नाळा ते कोरे जेटीचे काम दीड वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे समुद्रमार्गे पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल शकेल, असे खासदार गावित यांनी विश्वास व्यक्त केला.

जिल्ह्यातील पश्चिम भागातील पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांतील नागरिकांना पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव पर्याय आहे. सरकारने एमएमआरडीएतर्फे वसईतील मारबळ पाडा ते पालघरमधील टेंभी खोडावे या खाडीवर ६४५ कोटी रुपये खर्चाच्या पाच किलोमीटर लांबीच्या पुलाला मंजुरी मिळाली आहे. तसेच सातपाटी ते मुरबा या खाडीवर ३४० कोटींचा पूल मंजूर झाला आहे. यासाठी सध्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यामुळे थेट गुजरात राज्यापर्यंत जाण्यासाठी नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे गुजरातमधील पर्यटकही आकर्षित होतील, असे राजेंद्र गावित यांनी सांगितले. सातपाटी येथे अद्ययावत मासेमारी बंदर उभारण्यासाठी २८४ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरीही देण्यात आल्याचे ते म्हणाले.
------------------
गाव व किनारे स्वच्छ केल्यास पर्यटक आकर्षित होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगर परिषदेने गाव व किनारा स्वच्छ करण्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबवला आहे. गावातल्या विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने दिवस ठरवले आहेत.केळवे ग्रामपंचायतीनेही अशा स्वरूपाचा प्रयोग केल्यास या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतील.
- संजय यादवराव, कोकण पर्यटन संस्था
---------
तारपा नृत्याने महोत्सवाला सुरुवात
केळवे पर्यटन महोत्सवाला आदिवासींच्या तारपा नृत्याने सुरुवात झाली. उत्सवात जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचबरोबर खवय्यासाठी वाडवळी, आगरी, मच्छीमार पद्धतीचे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. रवळी, अळूवडी आदी स्थानिक पदार्थांची चव येथे चाखायला मिळणार आहे.

फोटो : आदिवासींचे तारपा नृत्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com