रस्त्याच्या रुंदीकरणासाठी घरांना नोटिसा

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी घरांना नोटिसा
Published on

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : घोडबंदर गावातून किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी गावातील जुन्या घरांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, याविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी नोटिसांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यावर फेरविचार करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे.
घोडबंदर येथील ऐतिहासिक किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. या किल्ल्यामुळे पर्यटन वाढीस लागणार आहे. यासाठी महापालिकेने घोडबंदर गावातून जाणारा मुख्य रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात गावातील रस्त्यालगतच्या २५ घरांना नोटिसा बजावल्या. यावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला. नोटिसांवर ठेवण्यात आलेल्या सुनावणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने महापालिकेच्या मिरा रोड येथील नगररचना विभागाच्या कार्यालयात धडक दिली व शेकडो हरकती नोंदवल्या. गावातील रस्ता रुंदीकरण करण्याऐवजी उर्वरित दोन रस्ते विकसित करावेत, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे नोंदवली. त्यानंतर महापालिकेने बजावलेल्या नोटिसांचा फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे चंद्रकांत वैती यांनी सांगितले. याच विषयावर खासदार राजन विचारे यांनीही आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन ग्रामस्थांना दिलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी केली.

आणखी २०० घरे नोटिशीच्या घेऱ्यात
घोडबंदर गावात शेकडो वर्षांपूर्वीपासून लोक स्थायिक आहेत. या सर्वांच्या घरांना रस्ता रुंदीकरणासाठी नोटिसा बजावणे हा ग्रामस्थांवर अन्याय आहे. सध्या २५ घरांना नोटिसा बजावल्या आहेत. आणखी २००च्या आसपास घरांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यामुळे याविरोधात ग्रामस्थ एकत्र आले आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवासी व माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दिली.

पिढ्यान पिढ्यांची घरे
वास्तविक किल्‍ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला जेसल पार्क ते घोडबंदर या रस्त्यावरून जोडरस्ता देण्यात येणार आहे. हाच रस्ता किल्ल्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी काम सुरू आहे. या व्यतिरिक्त २०१८ मध्ये किल्ल्याच्या मागील बाजूने शेतजमिनीतून आणखी एक रस्ता प्रस्तावित करून त्याला महासभेची मान्यताही घेण्यात आली आहे. असे असताना गावातून जाणारा जुना रस्ता रुंद करण्याची आवश्यकताच नाही. सध्या हा रस्ता आठ ते दहा मीटर रुंद आहे. तो १८ मीटर रुंद करायचा झाल्यास ग्रामस्थांची पिढ्यान पिढ्यांची घरे तोडावी लागतील, अशी माहिती चंद्रकांत वैती यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com