सेंद्रिय खतांद्वारे फुलवले शेतीत नंदनवन

सेंद्रिय खतांद्वारे फुलवले शेतीत नंदनवन

कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिले जाणारे शेतकरी पुरस्कार रखडलेले होते; मात्र नुकेतच शासनाने ते पुरस्कार जाहीर केले असून सन २०२० चा वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार हा कल्याण तालुक्यातील कोसले गावचे श्रीराम विठ्ठल पालवी यांना ठाणे जिल्हा विभागात जाहीर झाला आहे. ठाणे जिल्हा कृषी विभाग, कल्याण तालुका कृषी विभाग, आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापना यंत्रणा), पंचायत समिती कृषी विभाग या शासनाच्या विभागाकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

श्रीराम विठ्ठल पालवी हे मागील ३० वर्षांपासून शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्या मालकीची आठ एकर शेती आहे. त्यामध्ये माळरान (वरकस) जमीन साडेतीन एकर आहे. कल्याणच्या ग्रामीण भागातही झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यात अनेक शेतकरी आपल्या पारंपरिक शेती व्यवसायाकडे कानाडोळा करत आहेत; मात्र श्रीराम पालवी यांनी शेतकरी आपल्या शेतीचे नंदनवन करीत इतरांपुढे नवा आर्दश निमार्ण केला आहे.

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले पालवी यांनी आपल्या शालेय जीवनात संत गाडगेबाबा विद्यालयात शेतीविषयक धडे घेतले. पुढे पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सेंद्रिय शेती विकसित केली आहे. सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचा पोत कसा वाढेल याकडेदेखील त्यांचा भर आहे. सुरुवातीला कावडीने पाणी वाहून भाजीपाला शेती केली. आता विहीर आणि बोअरवेलच्या माध्यमातून ठिंबक सिचन पद्धतीने शेतातील भाजीपाला आदी पिकांना पाणी दिले जात आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शासनाच्या कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत उत्पादनवाढ कशी होईल याकडे भर देत आहेत. पावसाळ्यात भातशेती लागवड करतात. यंदा त्यांनी १२५ पोती भाताचे उत्पादन घेतले. उत्पादन खर्च वजा करून जवळपास ७५ हजाराहून रक्कम शिल्लक राहते. रब्बी हंगामात हरभरा, वाल, तूर, मोहरी आदी पिकांसह उन्हाळ्यात भाजीपाला, भेंडी, वांगी, घोसाळी, काकडी, फुल कोबी, चवळी, कलिंगड आदीचे उत्पादन घेतात. आंब्याची ५० संकरित कलमे, गावरान जांभळांतून दोन ते सव्वादोन लाखांचे उत्पन्न मिळते.

सेंद्रिय खत, शेणखत, गांडुळ खत, कोंबडी खतांच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. शेती व्यवसायात त्यांची पत्नी सविता पालवी यादेखील मदत करतात. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एकत्रित करून सेंद्रिय खताच्या जोरावर शेतीत वेगवेगळे प्रयोग यशस्वीरीत्या केले आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये त्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ठाणे जिल्ह्यात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना याआधी आदर्शवत शेतकरी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने सन्मानित केले आहे. यापूर्वी विविध संस्था व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचा गौरव केला आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो जगला पाहिजे, भारत हा कृषिप्रधान देश असून प्रत्येक तरुणाने शेतीत नवनवीन तंत्रशुद्ध यंत्र वापरावेत, तसेच आधुनिक शेती करून देशाला शेतीत सुजलाम सुफलाम बनवले पाहिजे. वेळोवेळी गावातील तरुणांना शेतीविषयी योग्य मार्गदर्शन करून त्यांची कार्यशाळा घेतो. तरुणाईला शेती व्यवस्थापनाचे धडे देत शेतीचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतो.
- श्रीराम पालवी, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com