Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay YatraSakal

Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेचा शिवाजी पार्कात समारोप; परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

शान्य भारताकडून निघालेली ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची सामाजिक न्याय यात्रा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.
Published on

Mumbai News : ईशान्य भारताकडून निघालेली ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची सामाजिक न्याय यात्रा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. काँग्रेसने यात्रेची समाप्ती करण्यासाठी मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलातील (बीकेसी) जागेसाठी पर्याय म्हणून अर्ज केला असला तरी समारोप मुंबईचे हृदयस्थान असलेल्या शिवाजी पार्कात व्हावा, असे पक्षाला वाटते; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीवर जागेचा निर्णय अवलंबून असेल. भाजपप्रणित राज्य सरकार या परवानगीबाबत नकार तर देणार नाही ना, या चिंतेने काँग्रेसला पछाडले आहे.

राहुल यांची सामाजिक न्याययात्रा १२ मार्च रोजी नंदुरबार येथे महाराष्ट्रात प्रवेश करेल. या दरम्यान गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातील बडे नेते पक्ष सोडून जाऊ नयेत, याची काळजीही नेत्यांना आहेच; मात्र समारोपानिमित्त मुंबईतील सभा विशाल व्हावी, याची तयारी केली जात आहे. सोनिया गांधी राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झाल्या, तेव्हा शिवाजी पार्कातच सभा झाली होती. दरम्यान, समारोपासाठी शिवाजी पार्कची परवानगी देण्यात यावी, असा अर्ज काँग्रेसने केला आहे. ध्वनिपातळी मर्यादेत राखण्याची हमी देण्यास कॉँग्रेस तयार आहे. ‘शिवाजी पार्क रेसिडेंट असोसिएशन’शीही चर्चा केली जाईल, असे मुंबई काँग्रेसने स्पष्ट केले.

सार्वजनिक उपयोगाच्या या जागेवर न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्षातील १५ दिवस सभा-संमेलनांसाठी परवानगी देता येते. ही परवानगी देणे हा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकक्षेतील विषय आहे. कोणताही धोका नको, म्हणून पर्यायांचा विचार होत असला तरी १५ ते २० मार्च असे सलग पाच दिवस परवानगी मागणारा अर्ज काँग्रेसने सादर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्याची जबाबदारीही महाराष्ट्रातील नेत्यांवर सोपवण्यात येणार आहे.

‘इंडिया’ आघाडीला आमंत्रण

पालिका प्रशासनाला १५ मार्च ते २० मार्च अशा पाच दिवसांसाठी मैदान राखून ठेवण्यात यावे, असे पत्र पाठवण्यात आले आहे. ते पालिकेकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाते. यात्रेचा कार्यक्रम कधी अचानक बदलून एक-दोन दिवसांचा फरक पडत असल्याने पाच दिवसांची परवानगी मागण्यात आली आहे. सध्याच्या स्थितीत १७ मार्च रोजी यात्रेच्या समारोपाची विशाल सभा होईल, असा अंदाज आहे. समारोप समारंभाला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष हजर राहणार असून ‘इंडिया’ आघाडीतील सर्वांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.

शक्तिप्रदर्शनाची संधी

राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील या यात्रेचा समारोप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने यानिमित्ताने ‘इंडिया’ला शक्तिप्रदर्शनाची संधी मिळणार आहे. के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला हे काँग्रेस नेते ७ मार्च रोजी मुंबईत येणार असून, महाराष्ट्राच्या जागावाटपावरही दोघे नेते सर्व संबंधितांशी चर्चा करतील. नंदूरबारला १० मार्चला राहुल गांधींची यात्रा पोहोचेल. आज त्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईहून नंदूरबारला रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com