चौकातील सौंदर्यीकरणाला अवकळा

चौकातील सौंदर्यीकरणाला अवकळा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : शहर सौंदर्यात चार चांद लावणारे वेगवेगळ्या आकाराचे रंगीत कारंजे गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी गढूळ झाले आहे. शहरातील धूळ कमी करण्यासाठी या कारंजांचा वापर करण्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत होते; मात्र आता काही दिवसांपासून हे कारंजे बंद असल्याने धूलिकणांचाही त्रास वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत.
नवी मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक चौक आणि मुख्य रस्त्यांच्या दुभाजकांचे सशोभीकरण करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत शहर सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेने अनेक ठिकाणी शिल्प आणि कारंजे बसवले आहेत. अगदी बेलापूरपासून ऐरोलीपर्यंतचे महत्त्वाचे रस्ते, सेवा रस्ते, चौकांमध्ये वेगवेगळ्या आकारांत कारंजे बसवण्यात आले आहेत. महापालिकेने बसवलेल्या कारंजांपैकी बहुतांश कारंजे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. करावे गावाहून पाम बीचच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेले कारंजे, नेरूळ एनएमएमटी बस डेपोजवळील कारंजे पाण्याविना बंद पडले आहेत. नेरूळ, जुईनगर, बेलापूर, सानपाडा, वाशी परिसरात महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या कारंजांची अवस्था खराब झाली आहे. रात्रीच्या वेळी कारंजांचे दिवे बंद असल्याने या भागात काळोख पसरलेला असतो.

-----------------
कारंजांची तांत्रिक कामे सुरू असल्यामुळे बंद करण्यात आले होते. आता कामे पूर्णत्वास आल्यानंतर कारंजे तात्काळ सुरू केले जातील.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com