चुकीच्या शब्दामुळे सुहास देसाई ट्रोल

चुकीच्या शब्दामुळे सुहास देसाई ट्रोल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : निवडणुकीच्या रणधुमाळीत विविध पक्षांचे नेते, उमेदवार विविध आरोप-प्रत्यारोप करत असतात आणि झेलत असतात. तसेच अनेक आश्‍वासनेही देत असतात, पण अनेकदा बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द बोलून गेल्याने त्यांची पंचाईतही होत असते. असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्याबद्दल झाला आहे. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित एका मेळाव्यातील त्यांच्या एका चुकून उच्चारल्या गेलेल्या शब्दामुळे समाजमाध्यमांवर देसाई यांना ट्रोलिंगचे धनी व्हावे लागले आहे.

महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता.२) विभागीय मेळावा पार पडला. यात शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हाध्यक्ष केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई उपस्थित होते. यावेळी देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांनी माझ्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. मी राजन विचारे यांचा प्रचार करत आहे. असे म्हटल्‍यानंतर इंडिया आघाडीने जो नेता उमेदवार म्हणून दिला आहे, तो निष्ठावान आणि ‘चारित्र्यहीन’ आहे, असे देसाई अनावधानाने बोलून गेले. तेव्हा उपस्थितांनी त्यांना ते ‘चारित्र्यहीन’ नसून ‘चारित्र्यवान’ असल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर देसाई यांनी आपली चूक सुधारली, पण या वक्तव्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसूत झाल्यामुळे देसाई यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com