दिव्यात शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ

दिव्यात शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ

दिवा, ता. २५ (बातमीदार) : दिवा शहरातील जवळपास ९० टक्के वाहतूक व्यवस्था ही रिक्षावर अवलंबून आहे. सुरुवातीपासूनच दिव्यात शेअर पद्धतीनुसार रिक्षा भाडे आकारणी केली जात आहे; मात्र नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियनने वाढवले. ज्याची अंमलबजावणी रविवारपासून (ता. २१) करण्यात आली आहे. रिक्षा युनियनने केलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. तसेच भाडेवाढीबाबत व्हॉट्सॲप आणि फेसबुक या समाजमाध्यमांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती रेल्वे स्थानकापासून एक ते साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात पसरलेली आहे. दिवा स्टेशन ते आगासन फाटक (३ किमी), दिवा स्टेशन ते बेडेकर नगर (२.१ किमी), दिवा स्टेशन ते गणेश नगर (१.९ किमी), दिवा स्टेशन ते ग्लोबल शाळा (१.६ किमी), दिवा स्टेशन ते दातिवली फाटक (१.७ किमी), दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर- दातिवली (१.५ किमी), दिवा स्टेशन ते साबे जीवदानी मंदिर (१.५ किमी) या अंतरासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मीटरप्रमाणे रिक्षाचे भाडे पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आकारले जाते.

साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंतचे अंतर हे अनुक्रमे एक किमी आणि १.६ किमी आहे; परंतु आता नवीन दरानुसार साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत एका व्यक्तीमागे १५ रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीटप्रमाणे रिक्षाचालकाला साधारणपणे ४५ रुपये मिळतात. २०२० मध्ये टाळेबंदीपूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी जाण्यासाठी सीटमागे प्रत्येकी १० रुपये आकारले जात होते; पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षामध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती, त्यामुळे रिक्षाचालकांकडून १० रुपयांच्या ऐवजी १५ रुपये आकारण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी नागरिकांनी विरोध केला नाही; मात्र कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही रिक्षाचे वाढवलेले भाडे तसेच ठेवण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

डोंबिवली स्टेशनपासून रिजेन्सी अनंतम गेटपर्यंत साधारण २० रुपये शेअर रिक्षाचे भाडे आकारले जाते. हे अंतर अंदाजे तीन किलोमीटर आहे. त्यातुलनेत दिव्यात रिक्षा भाडे जास्तच असल्याने नागरिक उघडपणे विरोध करत आहेत. तर डोंबिवलीसारखेही दिव्यात दरदेखील आकारल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मीटरनुसार रिक्षा सेवा वाहतूक विभागाने सुरू केल्यास त्याचा फायदा रिक्षाचालक आणि प्रवासी या दोघांनाही होऊ शकेल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने दिव्यातील दोन्ही रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमती मार्ग काढण्याची मागणी दिव्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

दिव्यातील रिक्षा भाडेवाढीमुळे इथल्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडणार आहे. सामान्यतः मीटर रिक्षांचे भाडे जास्त असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी शेअर रिक्षा पद्धत वापरली जाते; पण दिव्यात मात्र शेअर ऑटोपेक्षा मीटर रिक्षा परवडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर रिक्षांचे दर कमी करता येत नसतील तर प्रशासनाने दिव्यातही मीटर रिक्षा पद्धत सुरू करावी.
-तुषार भास्कर पाटील

टाळेबंदीआधी दिवा स्टेशन ते बेडेकरनगर १२ रुपये प्रत्येक व्यक्ती रिक्षा भाडे होते. कोरोना काळात संसर्ग होऊन आजार वाढू नयेत, त्यासाठी रिक्षात फक्त दोन प्रवासी बंधनकारक होते. तेव्हा रिक्षा भाडे वाढवून १२च्या ऐवजी १५ करण्यात आले होते. त्यानंतर ते तसेच ठेवून आता पुन्हा रिक्षा भाडेवाढ करून १५ रुपयांवरून ती २० रुपये करण्यात आली. ही अशी चुकीची भाडेवाढ योग्य नाही.
-राकेश साळुंखे, बेडेकर नगर, नागरिक


वाढती महागाई, पेट्रोलच्या दरामुळे रिक्षाचालकांना दिव्यात रिक्षा चालवताना नेहमी त्रास होतो. तर आरटीओच्या नवीन नियमामुळे दिव्यातील रिक्षांमध्ये पाचऐवजी फक्त तीनच प्रवासी भरून वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे ही भाडेवाढ केलेली आहे. कोणताही रिक्षाचालक तीन प्रवाशांऐवजी पाच प्रवासी घेऊन स्टँडवरून निघाल्यास त्यावर यनियनतर्फे कारवाई करण्यात येईल.
-विनोद भगत, अध्यक्ष, शिवशक्ती रिक्षा युनियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com