‘सूर्या’चा पाणीपुरवठा जुलैपर्यंत?

‘सूर्या’चा पाणीपुरवठा जुलैपर्यंत?

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : सूर्या धरण पाणी योजनेतून मिरा-भाईंदर शहराला येत्या जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. वीजपुरवठ्याअभावी हा पुरवठा नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाणार होता. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते, मात्र आता वीजपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढून जुलैपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन ‘एमएमआरडीए’कडून मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिरा-भाईंदरसह वसई-विरार शहरासाठी एमएमआरडीए ‘सूर्या धरण पाणी योजना’ राबवत आहे. पहिल्या टप्प्यात वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे व दुसऱ्या टप्प्यात मेपर्यंत मिरा-भाईंदर शहराला २१८ दशलक्ष लिटर पाणी देण्यात येणार होते; परंतु मिरा-भाईंदर शहराला पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या स्रोताच्या जागी १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होणे आवश्यक आहे व त्यासाठी स्वतंत्र केबल टाकावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीकडून हे काम सुरू करण्यात आले आहे; परंतु प्रत्यक्ष वीजपुरवठा सुरू होण्यासाठी नोव्हेंबर उजाडणार आहे.

परिणामी, मिरा-भाईंदरचा पाणीपुरवठा मेऐवजी नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर जाणार होता. यासंदर्भातील सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने १२ एप्रिल रोजी ‘मिरा-भाईंदरला ‘सूर्या’चे पाणी लांबणीवर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि शहर अभियंता दीपक खांबित यांनी ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुग्दल यांची गुरुवारी (ता. २५) भेट घेतली व मिरा-भाईंदर शहराला लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्याबाबत विनंती केली.

त्यावर ‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेली सर्व कामे जूनपर्यंत पूर्ण होतील व वीजपुरवठ्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्येवर मार्ग काढून जुलैपर्यंत मिरा-भाईंदरच्या हद्दीवर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन मुग्दल यांनी दिले. या दरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेने चेणा ते हटकेश या दरम्यानच्या जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली. त्यामुळे आगामी जुलैपर्यंत मिरा-भाईंदरच्या नागरिकांना पाणीटंचाईतून कायमची सुटका मिळण्याची अपेक्षा आहे.

धरणात ४५ टक्के पाणीसाठा
मिरा-भाईंदरला बारवी आणि आंद्रे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही धरणातील पाणी उल्हास नदीत येते व तेथून स्टेम प्राधिकरण व ‘एमआयडीसी’च्या माध्यमातून मिरा-भाईंदरला पुरवठा केला जातो. सध्या या दोन्ही धरणांत सुमारे ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी दोन महिने म्हणजेच जूनपर्यंत मिरा-भाईंदरच्या नागरिकांना पाण्याच्या बाबतीत दिलासा मिळाला आहे.

शटडाऊन घेतल्यासच पाणीटंचाई
स्टेम अथवा एमआयडीसी या दोघांपैकी एकाने देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेतला, तरच शहरात दोन दिवस पाणीटंचाई निर्माण होते. एरवी मात्र नागरिकांना नियमित पाणी उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

सूर्याचे पाणी शहरात वितरित करण्यासाठी चेणा ते हटकेश जलवाहिनी अंथरण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांतच वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे.
- दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com