जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी

जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : सकाळी कामासाठी घरातून निघालेली व्यक्ती पुन्हा घरी सुखरूप परतेल की नाही, हाच विचार सध्या लोकलने प्रवास करणाऱ्या डोंबिवलीकरांच्या मनात येत आहे. चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनी असलेली मुंबईची लोकल सध्या जीवघेणी ठरत आहे. गेल्या तीन- चार दिवसांत दोन डोंबिवलीकरांचे गर्दीने बळी घेतलेले असताना बुधवारी (ता. १) आणखी एका डोंबिवलीकराचा या गर्दीने बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. २७ एप्रिलला डोंबिवली पश्चिमेतील राहुल अष्टेकर (४९) यांचा दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. गर्दीमुळे दररोज प्रवाशांचा जीव जात आहे, हे रेल्वे प्रशासनाला समजूनदेखील ते त्यावर उपाययोजना करत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेला प्रवास करण्यासाठी लोकलचा प्रवास हाच सोयीस्कर प्रवास आहे. सार्वजनिक वाहतुकीची सोय उपलब्ध नसल्याने प्रवासी लोकलच्या प्रवासावर अवलंबून आहेत. यामुळे मुंबईची लोकल ही चाकरमान्यांसाठी जीवनवाहिनीच आहे; मात्र लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात लोकलची संख्या न वाढल्याने हीच जीवनवाहिनी सध्या जीवघेणी ठरत आहे. लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून वाहत असल्याने या गर्दीमुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मागील सात दिवसांत तीन अपघाती मृत्यू
मागील सात दिवसांत डोंबिवलीतील तीन प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात २३ एप्रिलला अवघेश दुबे याचा दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला. या अपघाताची ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. तर २९ एप्रिलला डोंबिवली पूर्वेकडील रिया राजगोर या तरुणीचा कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पडून मृत्यू झाला. यानंतर आणखी एक अपघात समोर आला आहे. २७ एप्रिलला डोंबिवली पश्चिमेतील राहुल अष्टेकर यांचा दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे.

दरवाजात उभ्याने प्रवास
रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन उपाययोजना करत असते; मात्र तरीही अपघातांची मालिका थांबलेली नाही. लोकलवरील प्रवासी भार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात डोंबिवलीतून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी आहे. कल्याण दिशेने येणाऱ्या लोकल या आधीच भरलेल्या असतात. अनेक प्रवासी हे दारातच दरवाजा अडवून उभे असतात. यांसारख्या अनेक कारणांमुळे लोकलचा प्रवास दरवाजात उभ्याने करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com