जलमार्गाची प्रवासी संख्या घटली!

जलमार्गाची प्रवासी संख्या घटली!

साचलेला गाळ, जाचक अटींचा परिणाम, महत्त्वाकांक्षी योजना बारगळली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : एकीकडे जलमार्गाने होणारा मालवाहतुकीचा ग्राफ उंचावत आहे, तर दुसरीकडे या मार्गाने होणाऱ्या प्रवाशांची संख्या मात्र रोडावत आहे. गेल्या वर्षभरात जलमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त संख्येने घटली आहे. त्यामुळे आता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना बारगळल्याचे दिसत आहे.

वाहतूक कोंडीमुळे मुंबई ते कल्याणपर्यंतचे नागरिक त्रस्त आहेत. तर उपनगरीय रेल्वेतही गर्दी वाढत आहे. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी सागरमाला उपक्रमांतर्गत समुद्रकिनाऱ्याचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकारने आखली आहे.

या योजनेतून मुंबईत गेल्या काही वर्षात वॉटर टॅक्सी आणि रो-रो सेवा सुरू आहे. मात्र, सागरी महामंडळाच्या जाचक अटी आणि तिकीट दर महागडे असल्याने अनेक मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा बंद केल्या आहेत. त्यांच्या परिणाम थेट प्रवासी संख्येवर झाला आहे. २०२०-२१ मधील ८२ लाख प्रवाशांवरून २०२२-२३ या आर्थिक वर्षात १.८७ कोटी प्रवाशांची संख्या पोहचली होती.

विशेष म्हणजे, १७ फेब्रुवारी २०२२ पासून मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते मांडवा मार्गावर हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे. तसेच भाऊचा धक्का ते मांडवा जलमार्गावर रो-रो बोटसेवेला पर्यटकांचा आणि प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. मात्र, महागडे तिकीट आणि समुद्रातील गाळ नियमितपणे काढत नसल्याने वॉटर टॅक्सी गाळात रुतत असल्याचा घटना घडल्या आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सीचे मोठे नुकसान होत असल्याने अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे एक कोटी ८७ लाख प्रवासी संख्येवरून गेल्या आर्थिक वर्षांत एक कोटी ८३ लाख प्रवासी संख्या आली आहे.
-----
ग्राफिक्स -
सागरी प्रवासी
२०२०-२१ - ८२ लाख
२०२१-२२ - १ कोटी ३६ लाख
२०२२-२३ - १ कोटी ८७ लाख
२०२३-२४ - १ कोटी ८३ लाख
-----
समुद्रातील गाळाचा त्रास
प्रवासी बोटी सुरक्षित आणि नियमित चालाव्यात याकरिता मांडवा, मोरा, रेवस, आणि करंजादरम्यान दरवर्षी नियमितपणे कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी महामंडळाकडून समुद्रात साचलेला गाळ काढण्यात येतो. मात्र, तरीही वारंवार गाळ साचत ओहोटीदरम्यान फेरी बोटी बंद कराव्या लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com