मुंबईत रिक्षा स्टॅन्ड शोधू कुठे ?

मुंबईत रिक्षा स्टॅन्ड शोधू कुठे ?

नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सकाळी स्टेशनला पोहोचण्यासाठी आणि संध्याकाळी स्टेशनहून घरी जाण्यासाठी रिक्षा न मिळणे किंवा रिक्षावाल्यांनी भाडे नाकारणे ही रोजचीच कटकट झाली आहे. या विवंचनेतून प्रवाशांची सुटका व्हावी, म्हणून शहरात कित्येक ठिकाणी रिक्षा उभी करण्यासाठी किंवा शेअर रिक्षा सेवेसाठी रिक्षा स्टॅन्ड सुरू केले होते. मेट्रो आणि इतर विकासकामांसाठी मुंबईतील रिक्षा स्टॅन्डचे ९० टक्के थांबे गायब झाले आहेत. त्यामुळे रिक्षा स्टॅन्ड शोधू कुठे, अशी वेळ प्रवासी आणि रिक्षाचालकांवर आली आहे. दुसरीकडे याविरोधात रिक्षा संघटनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे नेते थंपी कुरियन म्हणाले की, मुंबई उपनगरातील रिक्षा स्टॅन्डच्या यादीप्रमाणे स्टॅन्डची संख्या मर्यादित असून नवीन रिक्षा स्टॅन्ड, तसेच ज्या ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड आहेत, मात्र त्या जागीचे खांब रस्ते बांधकामात काढले गेले आहेत. त्यामुळे असे ९० टक्के (खांब) थांबे पुन्हा सुरू करण्यात आलेले नाहीत. यासाठी रिक्षा थांबा असलेले खांब त्या ठिकाणी लावणे आवश्यक आहे. स्टॅन्डची संख्या मर्यादित आहे. त्यात रस्त्यावरून किंवा चौकातून एखा‌दे प्रवासीभाडे घेतल्यास वाहतूक पोलिस त्यावेळेस फोटो काढतात आणि दंड आकारतात. यात प्रथम गुन्ह्यास रुपये ५०० आणि त्यानंतर १,५०० पर्यंत ई-चलन आकारले जात आहे. तसेच पश्चिम उपनगरात १८२ तर पूर्व विभागात १३६ असे एकूण ३१८ रिक्षा स्टॅन्ड आहेत. मात्र, त्यापैकी अनेकांचे बोर्ड कोठे दिसत नाहीत, जे बसविणे अत्यंत गरजेचे आहे.
----
आरटीओ - सध्या स्टँड नोंदणी - अपेक्षित स्टॅन्ड
अंधेरी - २७६ - १,०४८
बोरीवली - २७९ - १,१५६
वडाळा - २७६ - ५८२
---
रिक्षाचालकांचा मुजोरपणा आणि त्यामुळे प्रवाशांसोबत उडणारे खटके कमी व्हावेत, यासाठी मुंबईत रेल्वे स्टेशनापासून ठराविक ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात आले. रस्त्यावर ठराविक ठिकाणी रिक्षा स्टॅन्डचे बोर्ड उभारण्यात आले होते; पण आता स्टॅन्ड दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो.
- प्रतीक भुरे, प्रवासी
----
रिक्षा २०१७ मध्ये परवाना खुला केला तेव्हा १.४० लाखावरून २.६० लाखांपर्यंत रिक्षांची संख्या पोहोचली आहे. सध्या ८३१ स्टॅन्ड असून त्यामध्ये एकूण २,७८६ रिक्षा उभ्या राहू शकतात. ही संख्या एकूण रिक्षांच्या तुलनेत केवळ एक टक्का इतकीच आहे. त्यामुळे एमएमआरटीएने समिती नेमून लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणार आहोत.
- थंपी कुरियन, सरचिटणीस, मुंबई रिक्षा मेन्स युनियन
----
मुंबईत विकासकामांसाठी रिक्षा स्टॅन्डचे खांब परत बसविले जात नाहीत. रिक्षा कुठे उभी केली तर पोलिस कारवाई करतात. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा टॅक्सी सेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com