माथाडी कामगारांना हवे आरोग्य सुरक्षा कवच

माथाडी कामगारांना हवे आरोग्य सुरक्षा कवच

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ११ : कामगार हे जीवाची पर्वा न करता काम करत असतात. ओझी वाहत असतात; मात्र या दरम्यान त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर येत असतो. कष्ट करणाऱ्या या माथाडी कामगारांना हक्काचे आरोग्य संरक्षण मिळावे. बोईसर आणि वसईत कामगार रुग्णालय असावे; तसेच सरकारकडून निवारा केंद्र, सुलभ स्वच्छतागृह, नव्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे येणाऱ्या सरकारने यासाठी एक आराखडा तयार केल्यास माथाडी कामगारांना लाभ मिळेल, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
पालघर जिल्हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या ठिकाणी बोईसर, तारापूर आणि वसईत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. लाखो कामगार कामासाठी ये-जा करत असतात. अवजड वाहनाने मालवाहतूक केली जाते. या औद्योगिक वसाहतीत महत्त्वाची भूमिका ही माथाडी कामगारांची असते. येणारा कच्चा व पक्का माल हा कारखान्यात ने-आण करण्यासाठी डोक्यावर ओझी वाहत असतात. उन्हातान्हाची पर्वा न करता काम करतात; मात्र या दरम्यान अनेकदा आरोग्य स्वास्थ्याच्या तक्रारी उद्‍भवतात. आरोग्याबाबत गंभीर समस्या निर्माण झाली, तर पालघरमध्ये व्यवस्था नसल्याने मुंबई येथील रुग्णालयात त्यांना जावे लागते. पालघर जिल्ह्यात कामगार रुग्णालय असेल, तर त्वरित उपचार घेणे शक्य आहे. विमा संरक्षण, कुटुंबासाठी योजना, सामाजिक योजनेचा लाभ माथाडी कामगारांना मिळावा, यासाठी सरकारने लक्ष घालण्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

औद्योगिक वसाहतीत काम करत आहे. मालाची वाहतूक करत असताना अनेकदा आरोग्याची समस्याही भेडसावत असते. अशा वेळी त्वरित उपचारासाठी सरकारने उपाययोजना केली पाहिजे. जेणेकरून प्रत्येक कामगाराला सुरक्षेची हमी मिळेल. कामाचा मोबदला वाढला, तर आर्थिक हातभार लागेल.
- विजय दगडू गावणकर, माथाडी कामगार

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आहेत. त्या मानाने त्यांना सोयी-सुविधा असाव्यात. कामगार रुग्णालय नसल्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तर अडचणींचा सामना करावा लागतो. त्या व्यक्तीचे कुटुंबही खचून जाते. त्यामुळे हा प्रथम विचार झाला पाहिजे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही आजाराच्या वेळी आरोग्य संरक्षण आणि मदत मिळावी, अशी तरतूद असावी.
- मोहन महाडिक, सदस्य, स्थानिक माथाडी कामगार कामगार संघटना

विविध योजना लाभ मिळावा
वसई, बोईसर, पालघर भागात औद्योगिक वसाहतीचे जाळे वाढत आहे. अनेक कंपन्या आहेत. माथाडी कामगार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, ते अनेक लाभांपासून वंचित आहेत. सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालय, औद्योगिक वसाहतीत निवारा केंद्र, कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या योजना मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते रणधीर कांबळे यांनी या वेळी आगामी सरकारकडे व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com