राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या वादग्रस्त विधानाने काँग्रेस चिंतेत

राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या वादग्रस्त विधानाने काँग्रेस चिंतेत

राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या वादग्रस्त विधानाने काँग्रेस चिंतेत
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महाराष्ट्रासह देशात पहिल्या तीन टप्प्यांत झालेल्या मतदानात काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीपुढे आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान उभे केल्याचे भाजपचे नेतेही वैयक्तिक मान्य करतात. मात्र असे असताना राज्यातील काही काँग्रेस नेत्यांच्या विधानांमुळे पक्ष अडचणीत येत असल्याची भावना काँग्रेसला आहे. या दोन्ही नेत्यांची दिल्ली हायकमांडने चांगली कानउघाडणी केल्याचे समजते.

यंदा महाराष्ट्र हे भाजपसाठी सर्वात कठीण राज्य मानले जात आहे. राज्यातील वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र काही कारण नसताना केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पक्ष अडचणीत असल्याची भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींची आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यामुळे कसाब, मुस्लिम दहशतवादाचा मुद्दा भाजप उकरून काढणार हे माहिती असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद करकरे यांना कुणाची गोळी लागली हे वादग्रस्त विधान केले. पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांकडून आता वडेट्टीवार यांचे हे विधान प्रचारादरम्यान सातत्याने वापरले जात आहे.

वडेट्टीवार यांचे प्रकरण संपत नाही तोच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचे शुद्धीकरण करू, असे वादग्रस्त विधान केले. चार शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठेबद्दल आक्षेप घेतल्याचा हवाला देत त्यांनी हे वक्तव्य केले. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या विधानाच्या एक दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येत जात श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यामुळे काँग्रेस दलित, आदिवासींविरोधी असल्याची राळ भाजप नेत्यांनी उठवली आहे.

..
कानउघाडणी
नाना पटोले यांनी राम मंदिरासारख्या संवेदनशील मुद्यावर खरं तर काही बोलण्याची काहीच गरज नव्हती. जेव्हा पक्षाचा प्रचार मुद्यांवर केंद्रित आहे, त्यावेळी नाना पटोले यांचे विधान योग्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींचे मत आहे. त्यामुळे यापुढे काही बोलताना सावधगिरी बाळगा, या शब्दांत दिल्लीतील काँग्रेस नेत्याने नाना पटोले यांना फटकारले असल्याचे सांगण्यात येते; तर विजय वडेट्टीवार यांना तर निवडणूक होईपर्यंत शांत बसा, असे निर्देश यापूर्वीच दिल्लीतील नेतृत्वाने दिले आहेत.

वादग्रस्त वक्तव्यांची परंपरा
दरवेळी लोकसभा निवडणुकांदरम्यान काही नेत्यांकडून हमखास वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणण्याची एक मोठी परंपरा काँग्रेसमध्ये आहे. त्याचा भाजपने कायम राजकीय फायदा उचलला आहे. मात्र यावेळी सॅम पित्रोदा यांसारखे एखादा अपवाद वगळता, फारसे वादग्रस्त विधान कुणी केले नाही. भाजप नेत्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रचारालाही काँग्रेसकडून नियोजनबद्ध, संयमी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्यांवर भाजपला फरफटत यावे लागते असे चित्र आहे.

वादग्रस्त विधाने : भाजपची उत्तरे
विजय वडेट्टीवार : शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती.
नरेंद्र मोदी : काँग्रेसचे नेते दहशतवादी कसाबचा पक्ष घेत आहेत. हा शहिदांचा अपमान आहे.

नाना पटोले : सत्तेत आल्यावर राम मंदिराचे शुद्धीकरण करू
नरेंद्र मोदी : राम सर्व विश्वाचे आहे. अशा या प्रभू रामाला काँग्रेस आयडिया ऑफ इंडियाच्या विरुद्ध मानते.

...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com