डम्पिंगमुळे गोवंडीकरांची घुसमट

डम्पिंगमुळे गोवंडीकरांची घुसमट

जीवन तांबे : सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १२ : डम्पिंग ग्राऊंड, एसएमएस कंपनी, सिमेंट कंपनी, अस्वछता यामुळे गोवंडीकर बेजार झाले आहेत. वाढते प्रदूषण आणि अस्वच्छतेमुळे परिसरात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांना भेडसावणारे हे प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे यंदा मतदान कोणाला करायचे आणि निवडून आल्यावर उमेदवार आमचे हे प्रश्न मार्गी लावतील का, असा प्रश्न गोवंडीकरांना पडला आहे.
मुंबई उपनगरातील गोवंडी हे सर्वात मोठे डम्पिंग ग्राऊंड आहे. याच परिसरात मुंबई महानगरपालिकेचा बायोकेमिकल प्रकल्प आहे. या जैविक प्रकल्पातून निघणारा विषारी वायू, सिमेंट कंपनी आणि अन्य रासायनिक कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि प्रदूषण होत आहे. या दूषित हवेमुळे दमा, क्षयरोग, श्वसन, त्वचा रोग अशा आजारांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. तसेच क्षयरोगाच्या आजाराने कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे.
डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. डम्पिंग, रासायनिक वायूच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत असल्याचे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरात मूलभूत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन आणि प्रतिनिधी अपयशी ठरले आहेत.
डम्पिंग ग्राऊंडची क्षमता कधीच संपली आहे. हे डम्पिंग लवकरात लवकर बंद करावे, तसेच रासायनिक कंपनी बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानादेखील प्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मतदारसंघातून निवडून गेलेले एकही खासदार, आमदार व नगरसेवक आमच्या आरोग्याचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे मतदान कोणाला करायचे, कोणता प्रतिनिधी निवडून द्यायचा, असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

...
ऊर्जा प्रकल्पाची नागरिकांना धास्ती
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जेचा प्रकल्प स्थानिक पर्यावरणासाठी घातक आहे. या प्रकल्पामुळे दिल्लीसारखे प्रदूषण या भागात निर्माण होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.

..............................
डम्पिंग ग्राऊंड, जैविक प्रकल्प आणि रासायनिक कंपन्यांमुळे आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. हे डम्पिंग, रासायनिक कंपनी हटवा, याकरिता कित्येकदा मोर्चे व आंदोलन केले, न्यायालयीन लढाई देत आहोत. या लढाईत मात्र कोणतेही प्रतिनिधी लक्ष देत नाहीत.
- जमीर कुरेशी, समाजसेवक

...........................
डम्पिंग आणि विषारी वायूमुळे माझ्या दोन मुलांना क्षयरोगाची लागण झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रदूषणात कसे जगायचे, हा मोठा प्रश्न आहे.
- नसीम मोहमद युसुब, स्थानिक रहिवासी

...................
कित्येक वर्षांपासून या परिसरात राहत आहोत. येथे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून प्रमुख प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. त्यामुळे मतदान करायचे की नाही, हा प्रश्न पडला आहे.
- प्रशांत विसावे, नवमतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com