बाहेरचे लोंढे रोखल्याशिवाय विकास अशक्य

बाहेरचे लोंढे रोखल्याशिवाय विकास अशक्य

ठाणे/कळवा, ता. १२ : संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रात जे लोंढे येत आहेत, ते ठाणे जिल्ह्यात स्थायिक होत आहेत. हा एकमेव असा जिल्हा आहे, जिथे पाच महापालिका आहेत. तुम्ही कितीही विकास करा. हे लोंढे जोपर्यंत थांबवणार नाहीत, तोपर्यंत तो अपूर्णच राहणार आहे, असा सूचक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
महायुतीचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातील नरेश म्हस्के यांच्या संयुक्त प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कळवा येथे सभा झाली. या वेळी ते बोलत होते. ठाणे शहराबद्दलच्या आपल्या आठवणी ताज्या करतानाच सध्याच्या या शहराच्या आणि जिल्ह्याच्या अवस्थेविषयी त्यांनी भाष्य केले. या मुद्द्याला धरूनच त्यांनी भाषणात परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा ताजा केला. परराज्यातील लोंढे आवरण्यासाठी संसदेत खासदारांनी आवाज उठवण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. दरम्यान, ही पहिली लोकसभा निवडणूक ज्याला विषयच नाही, असे ते म्हणाले. १९७५ पासून आणीबाणी, कांदा, बोफोर्स, विदेशी, मोदी लाट, पुलवामा हे विषय लोकसभा निवडणुकीत होते. आता कोणतेच विषय नसल्याने आई-बहिणीवर आले असल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवार फोडाफोडीचे जनक
फोडाफोडीचे राजकारण आपल्याला मान्य नाही. तुम्ही ज्या आघाडीत एकत्र बसला आहात, त्यांनी काय केले हे बघा, असा टोला राज ठाकरे यांनी लावला. मनसेचे सात आमदार खोके देऊन उद्धव ठाकरे यांनी फोडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शरद पवार यांनी महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली असल्याचा दावाही केला. शरद पवार यांनी आधी काँग्रेस फोडून ‘पुलोद’ स्थापन केले. १९९१ मध्ये याच पवारांनी छगन भुजबळ यांना फितवून शिवसेना फोडली. त्यानंतर नारायण राणे यांना घेऊन काँग्रेसने शिवसेना फोडली असल्याचे ते म्हणाले.

ज्यांच्याविरोधात लढले,
त्यांच्यासोबत सरकार!
महाराष्ट्रात जो काही राजकीय गोंधळ सुरू आहे, त्याची सुरुवात २०१९ ला झाली. युती म्हणून तुम्ही निवडणूक लढवली. ज्या क्षणी तुमच्या लक्षात आले, की आपल्याशिवाय सत्ता येणार नाही, तेव्हा चार भिंतींच्या आत झालेल्या चर्चेचा हवाला देत ज्यांच्याविरोधात लढलात त्यांच्याच सोबत सरकार बनवले, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. जर २०१९ मध्ये तुमच्या मनासारखे घडले असते, तर आता तुम्ही मोदींविरोधात जे बोलत आहात, ते बोलला नसता, असेही ते म्हणाले.

पुन्हा ‘लावरे तो व्हिडीओ’
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राज ठाकरे यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ने धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती त्यांनी कळव्याच्या सभेत केली. या वेळी त्यांनी सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कसे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची जुनी क्लिप दाखवली. तुम्ही सारखे बाप चोरला म्हणून सहानुभूती घेत आहात ना, मग ज्या महिलेने तुमच्या वडिलांविरोधात भाष्य केले तिला तुमच्या पक्षाची प्रवक्ता कशी केली, असा सवाल केला. तसेच ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना तुरुंगात टाकण्याचा कट रचला, त्यांना सरकारमध्ये मंत्री बनवून मांडीला मांडी लावून कसे बसलात, असा सवाल केला.
----
विकासासोबत सुरक्षा महत्त्वाची!
भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी मुंब्य्रातील दहशतवादी कारवायांचा पाढा वाचला. देशावर प्रेम करणारे जसे मुसलमान आहेत, तसे काही उपद्रवीसुद्धा आहेत. त्यांना गेल्या १० वर्षांत डोके वर काढता आले नाहीत. म्हणूनच काँग्रेस व उद्धव ठाकरेंना मतदान करण्याचे फतवे निघत असल्याचे ते म्हणाले. पण हा धोक्याचा इशारा असून विकासासोबत सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

अजून फेव्‍हिकॉल लागलाय कुठे?
मनसे व शिवसेना शिंदे गटाचे नाते फेव्‍हिकोलसारखे घट्ट होत असल्याचा उल्लेख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला होता. तो धागा पडकत माझा बाहेरून पाठिंबा आहे, मी काहीही बोलू शकतो. आपल्याला अजून फेव्‍हिकॉल लागलाय कुठे, असा टोला लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com