पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा

पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा

पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा
अनेक लोकल फेऱ्या रद्द; शेकडो विलंबाने; मुंबईकरांचे हाल


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी सिग्नल यंत्रणेत झालेला बिघाड आणि संध्याकाळी वादळी- वाऱ्यासह पावसामुळे ओव्हरहेड वायरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड यामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले. या घटनांमुळे मध्य रेल्वेवर अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर शेकडो लोकल फेऱ्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
ठाणे स्थानकात सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्व मार्गिकेवरील सिग्नल यंत्रणा कोलमडली होती. त्यामुळे कल्याण ते कुर्लादरम्यान लोकल सेवा खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झाले. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर सिग्नल यंत्रणेतील बिघाड सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी दुरुस्त करण्यात आला. या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल एका मागे एक खोळंबल्या होत्या, तसेच लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जात नजीकचे रेल्वे स्थानक गाठले. कल्याणहून कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या तब्बल २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना कार्यालयात लेटमार्क लागला.
...
ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी
मुंबईसह उपनगरांत सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने रेल्वे वाहतुकीला फटका बसला. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान झाडाची फांदी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्याने काही काळ बदलापूर ते कर्जतदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती.
...
ओएचईचा खांब वाकला
मुलुंड ते ठाणे स्थानकांदरम्यान संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास डाऊन मार्गावरील ओएचई वायरचा खांब वाकल्याने ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल खोळंबल्या होत्या. त्यानंतर डाऊन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथकाने घटनास्थळी दाखल होऊन वाकलेला खांब दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. संध्याकाळी ६.५६ वाजता हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. या बिघाडामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या जलद आणि धीम्या लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडून पडले.
...
मुंबईकरांचे प्रचंड हाल
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लोकल सेवांचा वेग कमी करण्यात आला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विलंबाने धावत होत्या. विशेष म्हणजे, सकाळी सिग्नल बिघाड, त्यानंतर दुपारी वादळी वाऱ्यासह पावसामुळे दिवसभर मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.
..
सकाळी नऊ ते दहा या वेळेत सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. याचा सुमारे तासभर वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र, या वेळेत काही गाड्या सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राहण्यास मदत झाली.
- केशव तावडे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक, ठाणे
..
रेल्वेने कालच रविवार (ता. १२) पावसाळी आणि इतर कामासाठी मेगाब्लॉक घेतला होता. मग हा ब्लॉक घेऊन कोणते काम केले? गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे व्यवस्थापन कुचकामी झाले आहे. गर्दीमुळे रोजच प्रवाशाचा पडून मृत्यू होतो. लोकप्रतिनिधींचाही रेल्वे व्यवस्थापनेवर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची गत ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी झाली आहे. पश्‍चिम रेल्वेवर सगळ्यात जास्त वाहतुकीचा ताण आहे, तिथे अशा घटना का घडत नाहीत?
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com