धारावीकरांना हवी नवी ओळख

धारावीकरांना हवी नवी ओळख

मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : धारावी पुनर्विकास या विषयावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर सर्वच पक्ष जोर देत आहेत. अशा कित्येक निवडणुका येऊन गेल्या; पण धारावीकरांचा विकास काही झाला नाही. आता तरी फक्त धारावीचा पुनर्विकास नाही, तर लोकांच्या जगण्याचा दर्जा वाढवून धारावीची नवीन ओळख बनावी, अशी अपेक्षा धारावीतील रहिवासी सर्व पक्षांच्या उमेदवरांकडून व्यक्त करत आहेत.
धारावीसाठी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी बिरुदावली बऱ्याचदा वापरली जाते; पण धारावी हे महिन्याला एक हजार कोटी महसूल देणारा परिसर असल्याचे कुणी सांगत नाही, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते अनिल कासारे यांनी व्यक्त केली. आज ही धारावीमध्ये ६० हजाराहून अधिक घरे आणि १० लाखांहून अधिक लोकसंख्या दाटीवाटीने राहत असल्याचे सांगितले जाते. तसेच याच धारावीने लाखो बेरोजगारांच्या हाताला काम दिले असल्याचे कुणी का सांगत नाही, असा सवाल ही कासारे यांनी केला.
केवळ बॉलीवूडच नाही, तर हॉलीवूडलादेखील धारावीने नेहमीच मोहीत केले आहे. धारावी आणि तेथील जगण्याच्या संघर्षावर अनेक लघुपट आणि चित्रपट बनले आहेत. यात अधिकतर धारावीची काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे स्थानिक रहिवाशी अंजूम शेख यांनी सांगितले. अशा नकारात्मक प्रसिद्धीमुळे धारावीची केवळ वाईट बाजू लोकांसमोर आली आणि हे धारावी आणि धारावीकरांवर अन्याय करणारे असल्याचे ही अंजूम शेख यांनी सांगितले.
…..
अनेक समस्यांचा सामना
धारावीमध्ये समस्या नाहीत, असे नाही. येथे कचऱ्याचे योग्य नियोजन नाही, आरोग्य, वाहतूक कोंडी, रोगराईचा प्रश्नदेखील आहे. असे असले तरी राजकीय नेते येथे कधी फिरकल्याचे आठवत नाही, असे धरावीतील रहिवासी अयुब खान यांनी सांगितले. लोकसभा निवडणुका सुरू असल्याने आता नेते दिसायला लागले आहेत. फक्त नेते येत नाहीत, तर मोठमोठी आश्वासनेही देत आहेत; पण प्रश्‍न अद्यापपर्यंत का सुटले नाहीत, असा सवाल ही त्यांनी विचारला.
...
पुनर्विकासावरून रहिवाशांत संभ्रम
धारावी पुनर्विकासाचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांनी उचलला आहे. कोण म्हणतेय आम्ही एक नंबर विकास करू; तर कोण म्हणतेय, हा विकास नाही, भकास आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे रोहिणी नाडार यांचे म्हणणे आहे. विकासाला कुणाचा विरोध नाही मात्र या विकासाचे नेमके मॉ़डेल काय, याला मानवी चेहरा असेल का, हा प्रश्न आहे, असे ही त्या म्हणाल्या.
….
सकारात्मक चेहरा पुढे येणे गरजेचे
धारावीतील रोजगार आणि तेथील महसूल लक्षात घेतला, तर लाखो हातांना काम तिने दिले आहे. महिन्याला हजार कोटींच्या वर महसूल गोळा होतोय. मुंबईच्या आर्थिक विकासात धारावीचा मोठा हातभार आहे. यामुळे धारीव ही खऱ्या अर्थाने मुंबईची आर्थिक राजधानी आहे, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष लिबोरे यांनी सांगितले. धारावीचा हा सकारात्मक चेहरा पुढे येणे गरजेचे आहे, असे लिंबोरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com