सीएनजी पंप वाढवा; विमा संरक्षण द्या

सीएनजी पंप वाढवा; विमा संरक्षण द्या

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १४ : एकीकडे प्रत्येक प्रवाशाला चांगली सुविधा मिळावी, म्हणून खासगी वाहतूक सेवा काम करत असते. मात्र, नैसर्गिक संकटात या व्यवसायावर गदा येत आहे. वाहतूक कोंडी, सीएनजी पंपाची असुविधा, विमा संरक्षणाचा अभाव यांसह अनेक समस्या भेडसावत असतात. त्यामुळे येणाऱ्या सरकारने याकडे लक्ष घालून अधिकाधिक सोई-सुविधा रिक्षा, टेम्पोचालकांना दिल्यास दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यात अंतर्गत मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद महामार्ग आहे. या ठिकाणांहून रोज प्रवासी वाहतूक केली जाते; मात्र रस्त्याची दुरवस्था असल्याने वाहतूक कोंडीचा सामना रोजच करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करताना फेऱ्या कमी होत असतात. त्याचा परिणाम व्यवसायावर होत असून रिक्षाचालकांना आर्थिक नफा कमी होतो. त्यातच पर्यावरणपूरक रिक्षांचे प्रमाणही पालघरमध्ये वाढत आहे. त्या मानाने सीएनजी पंप नाहीत. त्यामुळे सीएनजी वाहनांच्या पंपावर रांगा लागतात. अनेकदा ठाण्याला जाऊन गॅस भरावा लागतो. त्यामुळे पैसे आणि वेळ वाया जातो. यासाठी पालघर जिल्ह्यात सीएनजी पंप स्थानकात वाढ झाली पाहिजे.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थिती; तसेच पावसाळ्यात जलमय परिसर झाला तर त्याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर होतो. अशा वेळी वाहनांसाठी काढलेले कर्ज, घर खर्च आणि अन्य खर्चिक बाब समोर येतात. कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होता. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला विमा संरक्षण सरकारने दिले पाहिजे. यासह रिक्षा तळ, अन्य सोई पुरवाव्यात, अशी अपेक्षाही रिक्षा व्यावसायिक करू लागले आहेत


अनेक ठिकाणचे रस्ते नादुरुस्त आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणे अवघड होत असते. महामार्गावरही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असते. पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. उड्डाणपुलाची निर्मिती केल्यास त्याचा फायदा होईल. इंधनाचे दर कमी झाले पाहिजेत. दरवाढीमुळे घरखर्च चालवताना बचत होत नाही. नव्या सरकारने याचा विचार करावा.
- सतीश कनोजिया, चालक

सीएनजी रिक्षांचे प्रमाण पालघर जिल्ह्यात वाढत आहे; मात्र त्यामानाने पंप नाहीत. त्यामुळे रिक्षांच्या रांगा लागत असताना प्रवासी वाहतूकीवर परिणाम होतो. व्यवसायालाही याचा फटका बसत असतो. अनेकदा ठाणे येथे सीएनजीसाठी जावे लागत असते. त्यामुळे पालघर जिल्ह्यात सीएनजी पंपाची वाढ झाली पाहिजे. याचा रिक्षा व्यावसायिकांना फायदा होईल.
- अमित तिर्लोटकर, रिक्षाचालक

रिक्षाचालकांना कोरोनाकाळात खूप अडचणी आल्या. अनेक जण बेरोजगार झाले. कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठीही हातात पैसे नव्हते. प्रवासी वाहतुकीवर निर्बंध असल्याने व्यवसायाचा मार्ग बंद झाला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत विमा संरक्षण मिळायला हवे. रिक्षाचालकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नव्या सरकारने योजना आणाव्यात; जेणेकरून जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
- माणिक चक्रवर्ती, रिक्षाचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com