नाल्यांत पर्णवेलींचा गालिचा

नाल्यांत पर्णवेलींचा गालिचा

वसई, ता. १५ (बातमीदार) : दरवर्षी पावसाळ्यात वसई-विरार शहरातील नागरिकांचे हाल होतात. रस्ते, नागरी वस्ती जलमय होऊन जनजीवन ठप्प होते. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून यंदा सार्वजनिक ठिकाणचे रस्ते उंच करणे, तसेच यंत्रसामग्रीचा वापर करून नालेसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, मे संपण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना कामे वेळेवर पूर्ण झाली नाहीत. नाल्यांमध्ये अजूनही पर्णवेली असून पावसाळ्यात वसईची ‘तुंबई’ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेत कामे करावीत, असे मत सुजाण नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

वसई-विरार शहरात १८० किलोमीटर लांबीचे १५० नाले आहेत. या नाल्यांत साचलेला गाळ, पर्णवेली काढण्यासाठी पालिकेची विशेष यंत्रणा काम करत असून १७ लाँग बूम, ४७ शॉर्ट बूम, २५ जेसीबी कार्यरत असून नाल्याच्या बाजूला काढलेला गाळ हटविण्यासाठी एकूण ३९ डंपरदेखील ताफ्यात आहेत. ज्याठिकाणी नालेसफाई करण्यासाठी पोहोचता येत नाही, त्याठिकाणी दोन तराफा वापरून नाल्याची सफाई केली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप पर्णवेलीचे जाळे घट्ट आहे. त्याठिकाणी गाळदेखील वाढला आहे. याचबरोबर ज्या ठिकाणचा गाळ काढून बाहेर टाकला जात आहे, तोदेखील जैसे थे या परिस्थितीत आहे. तसेच पर्णवेली ही मोठी समस्या आहे.

एकीकडे नालेसफाईचे काम अपूर्ण असून ते लवकर पूर्ण होईल, असा दावा प्रशासन करत आहे. दुसरीकडे वसई पूर्व, पश्चिमसह अन्य सखल भागात वाहतुकीला अडचण निर्माण होऊ नये, याकरिता रस्ते उंच करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पश्चिम येथे रस्त्यावर खडी अंथरली आहे, तर पुढच्या मार्गावर खोदकाम करून खडी टाकली जात आहे, मात्र डांबरीकरण झाले नाही. खडीच्या मार्गावरून रोज शेकडो वाहने प्रवास करत आहेत. त्यामुळे खडी निघत आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने कामे वेळेवर पूर्ण केली नाहीत, तर वसई-विरार शहरात तुंबई होईल. त्यामुळे प्रशासन किती जलदगतीने कामे पूर्ण करणार व जलमय परिस्थितीपासून दूर ठेवणार, हे पावसाळ्यातच स्पष्ट होणार आहे.

रस्त्यांचे काम अपूर्ण
अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कोंडी निर्माण होते. धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, मात्र पावसाळ्यासाठी हे रस्ते उंच होणार असल्याने समाधानदेखील व्यक्त करण्यात येत आहे, मात्र अपूर्ण कामे पूर्ण कधी होणार, याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

नालासोपारा परिसराकडे लक्ष देणे गरजेचे
नालासोपारा हा परिसर सखल आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचत असते. त्यात महत्त्वाचा परिसर म्हणजे तुळींज असून त्याठिकाणी दरवर्षी पाणी साचते. स्थानक स्थानकात ये-जा करणे मुश्किल होत असते, मात्र येथे रस्ते उंच केले असते, तर त्याचा फायदा नक्कीच झाला असता.

वसई-विरार शहरात पावसाचे पाणी साचू नये, त्याचा व्यवस्थित निचरा व्हावा, यासाठी नालेसफाई व रस्त्याचे काम केले जात आहे. मे अखेरीस ही कामे पूर्ण होतील, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. प्रभागानुसार आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेतला जात आहे.
- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com